छत्रपती संभाजीनगर : आज आम्हाला प्रत्यक्षात या भूमीवर, पृथ्वीवर राम अवतरले आहेत असे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. सोमवारी अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे भागवत कराड यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंत्री भागवत कराड म्हणाले की, "आपण नेहमीच देव, देश आणि धर्म असे म्हणत असतो. आज आम्हाला प्रत्यक्षात या मानव भूमीवर, पृथ्वीवर राम अवतरले आहेत असे वाटत आहे. रामाचा जन्म झाला त्याठिकाणी भव्य मंदिर असावं अशी ५०० वर्षांपासून आमची ईच्छा होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळे फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील हिंदु बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर शेकडो मंदिरांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे," असेही ते म्हणाले.