मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या ऊर्जा खात्याची जबाबदारी हाती घेतल्यानंतर विभागात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. महावितरणतर्फे ग्राहकांच्या समस्या सोडवण्याला गती देण्यात आली असून ऊर्जामंत्री फडणवीसांच्या सुचनेनंतर दहा दिवसांत २ लाख तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला काही निर्देश दिले होते. त्यात वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि ग्राहकाभिमूख सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावर तात्काळ action मोडवर येत महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा बंद झाल्याच्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण करण्याचे आदेश दिले होते.
दहा दिवसांत २ लाख तक्रारी निकाली
महावितरणने ग्राहकांच्या समस्या सोडवण्यात यशस्वी कामगिरी करून दाखवली आहे. अवघ्या दहा दिवसात जुन्या प्रलंबित आणि नव्या अशा दोन लाख तक्रारींचे निवारण महावितरणच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्याचसोबत बिलांबाबतच्या एक लाख ४२ हजार तक्रारींचे निवारणही दहा दिवसात युद्ध पातळीवर करण्यात आले.