१९०५ मध्ये दसर्याच्या दिवशी स्वदेशीच्या पुस्कारार्थ झालेल्या विदेशी कपड्याच्या होळीचे जनक ठरले स्वातंत्र्यवीर सावरकर. राजकारणासाठी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातून हकालपट्टी झालेले सावरकर हे पहिले विद्यार्थी ठरले.
देश स्वतंत्र होण्यासाठी एकट्याने लढून मरण आलं तरी चालेल; पण देशासाठी प्राण असेपर्यंत झुंजायचं, ही शिकवण देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर! दि. ७ ऑक्टोबर, १९०५ दसर्याचा दिवस होता तो. पण, या दिवशी पुण्यात मात्र साजरी झाली ती होळी! १९०२ मध्ये सावरकर शिक्षणासाठी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. नाशिकमधल्या तरुणांमध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवण्यात यशस्वी झालेले सावरकर आता पुण्यातल्या तरुणांना क्रांतीची दीक्षा देणार होते. आपल्या लेखणी आणि वाणीच्या प्रभावानं त्यांनी पुणेकरांना जिंकलं होतं. राजकीय, सामाजिक सभा संमेलनामध्ये सावरकरांचे विचार ऐकायला गर्दी होत होती. सावरकर हे स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. ‘बहिष्कारिण्या परदेशी वसन भारतात योजना छात्र मंडळात विलायती जाळा वस्त्रे छात्र गर्जतात लोक लक्तरे दास्याची फेकती मखात.’ स्वदेशीचा पुरस्कार म्हणजेच परदेशी मालावर बहिष्कार या विचाराने, ऑक्टोबरला भरलेल्या सभेत सावरकरांनी देशबांधवांना विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे आणि दसर्याच्या दिवशी परदेशी कपड्यांची होळी करण्याचे आवाहन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यसम्राट न. चिं. केळकर होते. काळकर्ते शिवरामपंत परांजपे सभेला उपस्थित होते. सर्वांनीच सावरकरांच्या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कपडे जाळून वाया घालवण्यापेक्षा, ते कपडे गरिबांना वाटून टाकावेत, असा विचार न. चिं. केळकरांनी मांडला. पण, सावरकरांना हा विचार पटला नाही. या होळीची इंग्लंडपर्यंत पोहोचणारी धग सावरकरांना जास्त महत्त्वाची वाटत होती.या सभेच्या दिवशी लोकमान्य टिळक पुण्यात नव्हते. ते परत येताच सावरकरांनी टिळकांना आपली योजना सांगितली. टिळकांनी त्याला मान्यता दिली. पण, थोडेथोडके नाही, तर ढिगाने कपडे गोळा झाले पाहिजेत, अशी अट घातली. सावरकरांनी ती अट मान्य केली. आपल्या संघटन कौशल्याने सावरकरांनी अनेक तरुणांना या कार्यासाठी उद्युक्त केले. ढिगावारी कपडे जमा झाले, ते कपडे भरलेल्या गाडीची मिरवणूक निघाली. मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात लोकमान्य टिळक मिरवणुकीत सहभागी झाले. लकडी पुलापलीकडे होळी पेटणार होती. टिळकांनी सुचवलं की, होळीच्या ठिकाणी भाषण न होता ती दुसर्या ठिकाणी घ्यावीत. सावरकरांना हे मान्य नव्हते. होळीसमोर भाषणं झाली नाहीत, तर त्याचा अपेक्षित परिणाम साधणार नाही, हे सावरकरांचे म्हणणे टिळकांनी मान्य केले आणि दसर्याच्या दिवशी पुण्यात धडाडली होळी! “स्वदेशी वस्तूंच्या पुरस्कारासाठी तरुणांनी सुरू केलेली ही चळवळ नक्की यशस्वी होणार,” असा आशीर्वाद टिळकांनी दिला.
धुमसणार्या त्या अग्निज्वाळांनी विनायकाला पाठिंबा देत इंग्रजांना प्रस् केले. होळीतील जळणार्या निखार्यांप्रमाणे धगधगती भाषणे झाली. शिवरामपंत परांजपे यांच्या जळजळीत, उपरोधिक भाषणानं त्या होळीत जणू तेलच ओतलं. या होळीचे चटके ब्रिटिशांना लंडनमध्येही जाणवले. ब्रिटिश सरकार हादरलं आणि या २२ वर्षांच्या ज्वालामुखीने इंग्रजांना भयभीत करून सोडले. सावरकरांचं हे ’जहाल’ कृत्य फर्ग्युसन महाविद्यालयातल्या ’मवाळां’ना झेपणार नव्हतं. नेमस्तांच्या ’इंदूप्रकाश’ या मुखपत्रात सावरकरांची निंदा करण्यात आली. फर्ग्युसनचे प्राचार्य र. पु. परांजपे यांनी सावरकरांना महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकलं, त्यांना दहा रुपये दंडही ठोठावला. याविरूद्ध महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. लोकमान्य टिळकांनी तर ’हे आमचे गुरूच नव्हेत’ या मथळ्याचा लेखच लिहिला. त्या काळानुरूप खूपच वाटणारा दंड भरण्यासाठी मुलांनी वर्गणी गोळा केली. पण, सावरकरांनी जमा झालेली रक्कम पैसा फंड आणि इतर काही संस्थांना देणगी म्हणून दिली आणि दंड स्वतःच भरला.
दक्षिण आफ्रिकेत असणार्या गांधीजींनी या होळीवर टीका केली. इंग्लंडबरोबर असणार्या आपल्या संबंधांना यामुळे इजा पोहोचते. त्यामुळे बहिष्काराच्या या चळवळीत द्वेष आणि हिंसा दोन्ही आहे, असे गांधीजींचे आणि त्यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांचे मत होते. या घटनेनंतर १७ वर्षांनी मतपरिवर्तन झालेल्या गांधीजींनी १९२१ मध्ये मुंबईत विदेशी कपड्यांची होळी केली. १९०५ मध्ये दसर्याच्या दिवशी स्वदेशीच्या पुस्कारार्थ झालेल्या विदेशी कपड्याच्या होळीचे जनक ठरले स्वातंत्र्यवीर सावरकर. राजकारणासाठी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातून हकालपट्टी झालेले सावरकर हे पहिले विद्यार्थी ठरले.’विषारी झाडांची पाने खुडत बसण्यापेक्षा त्यांच्या मुळावर घाव घातला, तर ते नष्ट होतील. कधीतरी तो घाव घालायचाच आहे, तर आजच तो का न घालावा,’ हे कडाडणारं व्यक्तित्व पुढे लंडनला जाऊन इंग्रजांचे हिंदुस्थानाभोवतीचे पाश मुळासकट उपटून फेकणे या देशकार्याच्या उद्देशाने लंडनला गेले.आज दिवसाआड नवनवीन ट्रेंड्स व फॅशन्स् फॉलो करणार्या जगाला तथा दिवसेंदिवस Western culture कडे अॅडिक्ट होत चाललेल्या तरुणाईला सावरकरांचा भारतीय संस्कृती जपणारा ’स्वदेशीचा’ गुण आत्मसात करण्याची नितांत गरज भासते.