मिझोराम सर्वात आनंदी राज्य

19 Apr 2023 21:51:54
Happiest State In India
 
नवी दिल्ली : सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात प्रत्येकाचा आनंदी राहण्याकडे कल वाढत आहे. गुरुग्राम येथील ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ने विविध निकषांवर केलेल्या पाहण्यात देशातील सर्वाधिक आनंदी राज्य म्हणून मिझोरमची निवड केली आहे.
 
’मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’चे प्राध्यापक राजेश के. पिलानिया यांनी केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. त्यात त्यांनी मिझोराम हे देशातील सर्वात आनंदी राज्य म्हणून घोषित केले आहे. मिझोरम हे 100 टक्के साक्षरता साध्य करणारे देशातील दुसरे राज्य आहे. आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीतही प्रगती करण्याची संधी राज्यात देण्यात येते, असे पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ने केलेल्या पाहणीत मिझोराम हॅपिनेस इंडेक्स सहा निकषांवर आधारित आहे. यामध्ये कौटुंबिक नातेसंबंध, कामाशी संबंधित मुद्दे, सामाजिक आणि लोकांच्या हिताचे मुद्दे, धर्म, ‘कोविड-19’चा आनंदावर होणारा परिणाम, शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश आहे.
 
 
अभ्यासपूर्ण अहवालात पुढे म्हटले आहे की, मिझो समुदायातील प्रत्येक मूल, हे आपण मुलगी आहोत की, मुलगा याची पर्वा न करता, लवकर कमाई करण्यास सुरुवात करतात. राज्यात कोणतेही काम लहान मानले जात नाही. तसेच युवकांना साधारणत: वयाच्या 16 किंवा 17 व्या वर्षी रोजगार मिळतो. त्याला प्रोत्साहन दिले जाते आणि मुला-मुलींमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही.

अहवालातील निष्कर्ष

मिझोरामच्या आयझॉल येथील वडील नसलेल्या विद्यार्थ्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही तो आशावादी असून अभ्यासात हुशार आहे. त्याला चार्टर्ड अकाऊंटंट किंवा सिव्हील सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळवायचे आहे.दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याला ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’त (एनडीए) प्रवेश घेण्याची इच्छा आहे. त्याचे वडील डेअरीत काम करतात आणि आई गृहिणी आहे. तो भवितव्याबद्दल आशावादी आहे.एका विद्यार्थ्याने सांगितले की, “आमचे शिक्षक आमचे चांगले मित्र आहेत, आम्ही त्यांच्याशी काहीही शेअर करण्यास घाबरत नाही किंवा लाजत नाही.”

मिझो कुटुंबात स्वावलंबनाचा मंत्र

मिझोराममध्ये विभक्त कुटुंबांची संख्या जास्त आहे. परंतु, समान परिस्थितीत अनेक समवयस्क असणे, नोकरदार माता आणि लहान वयातच आर्थिक स्वावलंबन असल्यामुळे येथे मुले वंचित राहत नाहीत. स्त्री-पुरुषांना उदरनिर्वाह करायला आणि एकमेकांवर अवलंबून राहायचं नाही, हे शिकवले जाते.









Powered By Sangraha 9.0