ठाणे : “असे काही औषध काढा ज्यामुळे ही असली दगडफेक बंद होईल आणि महाराष्ट्र शांत राहील,” असा टोला अमृता फडणवीस यांनी खा. संजय राऊत यांना लगावला आहे. आधार जेनेरिक औषधांच्या सातव्या टप्प्याच्या अनावरणच्या कार्यक्रमानिमित्त त्या मंगळवारी ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते रुग्णांना व रुग्णांच्या कुटुंबीयांच्या खिशाला परवडणार्या स्वस्त व अल्प दरातील आधार जेनेरिक औषधांच्या सातव्या टप्प्याचे अनावरण ठाण्यात झाले. भारत सरकारच्या ‘बेटर इंडिया व्हिजन’ला अधिक बळ देणार्या अर्जुन देशपांडे यांच्या जेनेरिक आधार उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी, “रुग्णांसाठी स्पृहणीय असलेल्या या उपक्रमातून आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून सक्षम भारताचीउभारणी होताना दिसेल,” असे सांगितले. दरम्यान, राऊत यांना आलेल्या कथित धमकीबाबत त्यांनी, “जेनेरीकच्या माध्यमातून असे काही तरी औषध काढा, ज्यामुळे ही असली दगडफेक बंद होईल आणि महाराष्ट्र शांत राहील,” असा टोला लगावला.