सर्वसामान्यांसाठी मातोश्रीसमोरचा रस्ता कशामुळे बंद असतो? चित्रा वाघ यांचा राऊतांवर पलटवार

02 Nov 2023 13:24:58

Chitra Wagh & Raut

मुंबई :
ठाण्याच्या लुईस वाडी भागातील रस्ता बंद करण्यात आल्याने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही का? असा सवाल त्यांनी राऊतांना केला आहे.
 
चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊतांना चांगलेच सुनावले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही काय? ठाकरे राजपरिवाराच्या या मातोश्री नामक किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी किती पोलीस पहारे, किती नाका बंदी आणि किती अडथळे पार करावे लागतात, हेही जनतेला कळू द्या," असे त्यांनी म्हटले आहे.
 
तसेच सर्वसामान्यांसाठी मातोश्रीसमोरचा रस्ता कशामुळे बंद असतो, हेही सांगाच एकदा, असेही त्यांनी म्हटले आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत गृहमंत्री देवेंद्रजी एकास एक आणि दुसऱ्यास दुसरा, असा भेदभाव करत नाहीत, हे आपल्याच उदाहरणावरून कळले असेलच.
 
तुमची महाज्ञानी टिवटिवही देवेंद्रजींच्याच सुरक्षाव्यवस्थेच्या छत्रछायेत चाललेली असते, याचा विसर पडू देऊ नका, असा टोलाही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला. तुमच्या सरकारच्या गृहमंत्र्यांनी वसुली धंदे केले. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचे पोलीस कुणाचे मिंधे नाहीत, हे लक्षात घ्या सर्वज्ञानी, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0