न्या. रानड्यांचा The Rise of Maratha Power हा ग्रंथ कोण विसरेल? इंग्रजांनी पद्धतशीरपणे छत्रपती शिवाजी महाराज दरोडेखोर होत म्हणून अपप्रचार चालवला होता. महाराष्ट्रात आणि देशभरात स्वकीयांना त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी या भंपक समजुतीचा प्रतिवाद करणं नितांत आवश्यक होतं. ते कार्य रानड्यांनी सुरू केलं. इ.स. १८३४ साली शिवाजी महाराजांचे एक चित्रं प्रसिद्ध झालं होतं. तेव्हापासून महाराजांविषयी जनतेत आदरमिश्रित कुतूहल होतं. यास देशभक्तीचे योग्य वळण देण्यात रानड्यांचा सिंहाचा वाटा आहे.
न्या. रानडे मराठा इतिहासाचे द्रष्टे इतिहासकार होते. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जाने १८४३ रोजी नाशिक जिल्ह्यात निफाड या गावी झाला. प्राथमिक शिक्षण कोल्हापूरमध्ये आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. इ. स. १८६२ मध्ये बी.ए. व इ. स. १८६४ मध्ये इतिहास व अर्थशास्त्र विषय घेऊन ते एम.ए. झाले. इ. स. १८६६ मध्ये एल.एल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. इ. स. १८९३ ते १९०१ या काळात ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश होते. नवजागृतीचा हा कालखंड होता. नवजागृतीमुळे देशाच्या स्थितीचा विचार होण्यास प्रारंभ झाला. संक्रमणाच्या या स्थितीत महाराष्ट्राच्या वैचारिक नेतृत्वाचे जनकत्व नया. रानडे यांचेकडे जाते. न्या. रानडे केवळ इतिहासाचे जाणकार नव्हते तर त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आदी विविध क्षेत्रात मुलभुत स्वरूपाचे विचार मांडले आहेत.
इ. स. १८९१ मध्ये न्या. रानडे यांनी इतिहास लेखनाची एक योजना आखली. या योजनेप्रमाणे बा. प्र. मोडक यांनी बहामनीकाल, कीर्तने यांनी शिवकाल आणि का.ना. साने यांनी पेशवेकालावर लिखाण करावे, न्या. तेलंगानी ते तपासावे असे ठरले होते. परंतू कांही कारणामुळे ही योजना पूर्ण झाली नाही. न्या. राजडे यांनी “' मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष '' हा ग्रंथ इ. स. १९०० मध्ये प्रसिध्द केला. त्याचप्रमाणे त्यांचे " "Currencies and Mints Under the Maratha Power" आणि "Introduction to the Peshwa Diaries" हे सर्वच लिखाण मुलभूत विवेचन करणारे आहे.
ग्रॅंट डफच्या इतिहास लिखाणाची रानड्यांनी समीक्षा केली. डफच्या मर्यादा त्यांनी स्पष्ट केल्या. ग्रॅंट डफचा “वणवा सिध्दांत'' त्यांनी खोडून काढला. मराठ्यांचे राज्य लूटमार व साहसावर अबलंबून नव्हते. राज्याच्या उभारणीमागे काही तात्विक प्रेरणा होत्या. नैतिक दृष्टिकोन होता. मराठ्यांच्या सत्तेचा उदय ही एक चळवळ होती. या चळवळीमागे राष्ट्रवादाची संकल्पना होती. हे सर्व आकस्मिक घडले नव्हते. याचा उहापोह न्या. रानडे यांनी त्यांच्या लिखाणात केला आहे.
न्या. रानडे यांचे इतिहासलेखन मराठ्यांच्या इतिहासातील तत्वज्ञान उलगडून दाखविणारे होते. या लिखाणामागे ग्रॅंट डफवर टीका करून त्याच्या चुका निदर्शनास आणणे एवढा मर्यादित उद्देश नव्हता, डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केल्याप्रमाणे, “भारतीय दृष्टीकोनातून इतिहासाचे विवेचन करून मराठ्यांच्या बदलचे गैरसमज दूर करून मराठ्यांच्या इतिहासाचे सत्यस्वरूप व मर्म लोकसमोर मांडणे हे त्यांचे ध्येय होते.” एकूण मराठ्यांच्या अभ्युदयाविषयी खोलवर रूजलेले गैरसमज नाहीसे करणे आणि इंग्रज राज्यकर्त्यांनासुध्दा त्याची जाणीव निर्माण करून देणे हे या ग्रंथाचे उद्देश होते. न्या. रानड्यांच्या ग्रंथातील विवेचनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठा सत्तेच्या उदयाचे न्या. रानडेंनी केलेले तात्विक मूल्यमापन आजही कायम राहिले आहे. ग्रंथलेखनानंतर मराठा इतिहासाची विपूल प्रमाणात साधने उपलब्ध झाली परंतु न्या. रानड्यांचे निष्कर्ष मात्र अबाधित आहेत. या ग्रंधातून मराठ्यांच्या इतिहासातील अनुस्युत तत्व अप्रतिम स्वरूपात न्या. रानडे यांनी उलगडुन दाखविले आहे.
न्या.रानडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
(संदर्भ - "मराठ्यांच्या इतिहासाचे लेखन : त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या संदर्भात विशेष अभ्यास" या शोधनिबंधातून)