कोकणी उत्पादनांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उभारणार! : आ. प्रवीण दरेकर

14 Jan 2023 14:42:54

Pravin Darekar


ठाणे : कोकणी उत्पादनांना मुंबई-ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असून यासाठी जी मदत लागेल ती बँकेच्या माध्यमातून करणार असल्याचे प्रतिपादन मुंबई बँक अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी केले. सीताराम राणे यांनी आयोजित केलेल्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या 24 व्या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी आ. दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आ. संजय केळकर, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, माजी नगसेवक संदीप लेले, सचिन मोरे, परिवहन सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते.


 
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा पुन्हा पूर्वीच्याच जोषात ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव होत आहे. दि. 13 जानेवारी ते दि. 22 जानेवारी या दहा दिवसांच्या भव्य मालवणी महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी आयोजक सीताराम राणे यांनी अग्निहोत्र करून केली. यावेळी उद्घाटन प्रसंगी आ. प्रवीण दरेकर यांनी, ठाकरे सरकारने कोकणी माणसाचा कधीच विचार केला नसला तरी आम्ही कोकणचे सर्व आमदार कोकणच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करू. तसेच, कोकणी उत्पादनाला कायम स्वरूपी बाजारपेठ मुंबई-ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार. यासाठी जी मदत लागेल ती बँकेच्या माध्यमातून करणार असल्याचे आश्वासन दरेकर यांनी दिले. दरम्यान, मालवणी महोत्सवात येऊन कसा वाटला? असा प्रश्न आ. दरेकर यांना करताच त्यांनी, ’बरा वाटला’ असा मालवणी भाषेत संवाद साधून यापेक्षा अधिक मालवणी भाषा येत नसल्याचे नमूद केले.
महोत्सवाला अवश्य भेट द्या...
ठाणेकर या महोत्सवाची वाट बघत असतात. या वर्षी हा उत्सव थोडासा उशिरा सुरू असला तरी, तोच उत्साह आहे. या ठिकाणी मांसाहाराबरोबर शाकाहारी पदार्थाची चव चाखता येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले.
मुंबई हातून जात असल्यानेच ठाकरे वैफल्यग्रस्त
आदित्य ठाकरे यांच्या ‘मातोश्री’कडे कंत्राटदारांची जेवढी माहिती असेल तेवढी अन्य कुणाकडे नाही. गेली 25 वर्षे टक्केवारीचा अनुभव आदित्य यांना आहे. आता गेले सहा महिने मुंबईकरांना जे हवे आहे ते फडणवीस-शिंदे सरकार देत आहे. त्यामुळेच त्यांना पोटशुळ उठला असून मुंबई हातातून जात असल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याची टीका आ. दरेकर यांनी केली. तर फडणवीस-शिंदे सरकार मुंबईबरोबरच ठाण्याचाही विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0