पुणे : कोरोनामुळे गेली दोन वर्षे असलेले निर्बंध वारकऱ्यांना वारीत सहभागी होण्यासाठी आडकाठी ठरत होते. यंदा मात्र परंपरेनुसार या 'आषाढ वारी'मध्ये सहभागी होण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून सोमवारी २० जून रोजी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून मंगळवारी २१ जून रोजी निघणार आहे. यात यावर्षी लाखो वारकरी सहभागी होणार आहेत.
पंढरपूरच्या दिशेने निघणाऱ्या या दोन्ही पालख्यांचे आगमन पुणे शहरात २२ जून रोजी सायंकाळी होईल. २३ जूनला पालख्यांचा मुक्काम असेल आणि २४ जून रोजी पालखी पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत. हा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन पोलीस विभागाने चार हजार पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. तसेच विविध पातळ्यांवर देखील तयारी करण्यात येत आहे. मोकळ्या वातावरणात होणाऱ्या या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.