नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली होती. याबाबत मंगळवारी नाशिक दौर्यावर असलेल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, “मला असे वाटते की, पवार साहेबांनी महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल. महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब, वनवासी, युवक, महिला, बारा बलुतेदारांसमोर असलेल्या प्रश्नांवर एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या सरकारला निर्देश दिले तर ते अधिक चांगले होईल. देशात मोदींचे सरकार उत्तम काम करत आहे. लोक मोदींवर खूश आहेत. लोकांनी वारंवार मोदींवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मला असे वाटते की, आता पवार साहेबांच्या बहुमूल्य सल्ल्याची आवश्यकता श्रीमान उद्धव ठाकरे यांना आहे,” असा खोचक टोला फडणवीसांनी पवारांना लगावला. यावेळी त्यांनी राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबाबत भूमिका व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील, असे मला वाटले नव्हते. जे सरकार लांगूलचालन करत आहे, ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्या की, हनुमान चालीसा म्हणायची घोषणा केल्यानंतर देशद्रोहाचा खटला दाखल केला जात आहे. खासदार-आमदारांना १२ दिवस तुरुंगामध्ये ठेवले जात आहे. त्यांच्याबाबत दुसरी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. मला असे वाटते की, या सरकारच्या विरोधात आम्ही तर लढतच आहोत, त्यांनीही लढले पाहिजे,” असा सल्लाही फडणवीस यांनी यावेळी राज ठाकरे यांना दिला आहे.
‘कोरोना’ काळात काही लोक घरात बसून होते
कोरोना काळात मानवतेची पारख झाली. समाजातील विविध वर्गाची परिभाषा कोरोना काळात ठरली असल्याचे देवेंद्र फडणवीस नाशिकमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीने आयोजित कार्यक्रमात म्हणाले. जे लोक मदत करू शकत होते, ते मात्र कोरोना काळात बाहेर पडले नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. भाजपने कोरोना काळात अहोरात्र काम केले. मात्र, काही लोक आव्हानांच्या काळात घरी बसून थट्टा करत असल्याचे सांगत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “समाजशील कार्य करणार्या नागरिकांचा सन्मान करताना आनंद झाला. सन्मानामुळे चांगल्या कामांचा पुरस्कार होऊन समाज उत्तमाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दिसून येते.”
नाशिक येथील कुंभमेळ्यात नाशिकमध्ये भाजप सरकारने भरीव काम केल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. गोदावरी नदीचे प्रदूषण संपविण्यासाठी त्या संदर्भात कार्य होत असल्याचे ते म्हणाले. नदी शुद्धीकरणाचा केंद्र सरकारने संकल्प केला असून देशातील तसेच राज्यातील नद्या प्रदूषणमुक्त होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
‘नमामि गोदा’ प्रकल्पाला केंद्र सरकारच्या माध्यमातून गतिमान करण्यात येणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. याप्रसंगी जयकुमार रावल, गिरीश महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी पालकमंत्री गिरीश महाजन, आ. जयकुमार रावल, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले यांसह भाजपचे शहर व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी कोरोना काळात उत्तम कार्य करणार्या व विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला.