नगर : "आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे," असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला आजपासून शिर्डी येथे सुरुवात झाली. या शिबिराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले.
राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील असेही जयंत पाटील यांनी सांगितले. राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली.
आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोहोचवा, ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. या शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रवक्ते, सरचिटणीस, फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख, संघटक सचिव, महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आदींसह सर्व निमंत्रित उपस्थित होते.