मुंबई: अंधेरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आले. या चिन्हांचा प्रचार करण्याचे काम दोन्ही गटांकडून जोरदार सुरु आहे. ठाकरे गटाने मशाल चिन्ह घरोघरी पोहचवण्यासाठी एक रणनीती आखली आहे. मशाल हे चिन्ह असलेली उटण्याची पाकीटं तयार केली आहेत. दिवाळीच्या निमित्ताने ही पाकिटं वाटून घराघरात मशाल हे चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे.
ठाकरे गट प्रथमच मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवणे हे ठाकरे यांच्या शिवसेनेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. जनतेला 'खरी शिवसेना आम्हीच' याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या या रणनीतीचा फायदा होणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.