नागपूर : वर्धा-देवळी मार्गावर असणाऱ्या सेलसुराजवळ सोमवारी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरूणांचा भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री दीडच्या सुमारास झाला असून यात सात तरूणांचा जागीच मृत्यू झाला. वाढदिवस साजरा करून घरी परतताना ही दुर्घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेची दखल घेत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधितून संबंधितांना मदत करण्याचे घोषित केले आहे.
'महाराष्ट्रात सेलसुरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मी तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो.', असे ट्विट पीएमओकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची मदत जाहीर केल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.