सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांची प्राणज्योत आज वयाच्या ९५ व्या वर्षी मालवली. दीर्घ आजाराशी त्यांची झुंज आज अखेर संपली. सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती शेकापचे मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोरडे यांनी दिली आहे.
सर्वाधिक म्हणजेच तब्बल ११ वेळा एकाच पक्षाकडून निवडणूक जिंकणारे विक्रमवीर आमदार अशी गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. सांगोला तालुक्यात त्यांनी शेती, सहकार, पाणी, स्त्री सक्षमता यांबद्दल भरीव कामगिरी केली. अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वैचारिक बैठकीशी ते एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने राज्यातील शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा ढासळला, अशा भावना अॅड. राजेंद्र कोरडे यांनी व्यक्त केल्या आहेत.