नूतन वर्षात सुट्यांची चंगळ अन विवाहोत्सुक मंडळींसाठी उदंड मुहूर्त - दा.कृ. सोमण
ठाणे: कोविड प्रादुर्भावाच्या कटू आठवणी विसरून सरत्या वर्षाला निरोप दिला जात असताना शुक्रवार दि.१ जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या नववर्षात काय होणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. नूतन वर्षात चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ आणि भरपूर विवाह मुहूर्त असल्याने विवाहोत्सुक मंडळींसाठी ही शुभवार्ता आहे. शिवाय नववर्षात आकाशात एकूण ४ चंद्र-सूर्य ग्रहणे होणार असली तरी आपल्या इथून एकही ग्रहण दिसणार नसल्याने २०२१ ग्रहणमुक्त वर्ष असेल, अशी माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली.
सरते वर्ष ३६६ दिवसांचे लीप वर्ष होते, परंतु सन २०२१ हे वर्ष ३६५ दिवसांचे असून नववर्षातील २५ सुट्यांपैकी २५ एप्रिल रोजी महावीर जयंती आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन या दोनच सुट्या रविवारी आल्या आहेत.यामुळे इतर दिनी चाकरमान्यांना २३ सुट्यांची चंगळ अनुभवता येणार आहे. एप्रिल महिन्यात आलेल्या ५ पैकी १३ एप्रिल गुढीपाडवा आणि १४ एप्रिल डॅा. आंबेडकर जयंती या दोन सुटया जोडून आल्या आहेत,अशी माहिती दा.कृ.सोमण यांनी दिली.
विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी मार्च, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यात भरपूर विवाह मुहूर्त आहेत. गणेशभक्तांसाठी २ मार्च, २७ जुलै आणि २३ नोव्हेंबर अशा तीन अंगारकी अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेल्या आहेत. सुवर्णखरेदी करणाऱ्यांसाठी २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी,३० सप्टेंबर,२८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग आले आहेत. सरत्या २०२० वर्षात ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाणार नसल्याने नूतन वर्षारंभ रात्री ठीक १२ वाजताच होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.
खगोलीय घटना मात्र ग्रहणमुक्त वर्ष:
नववर्षातील २६ मे बुधवारी होणारे खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसणार नसून ते फक्त ईशान्य भारतातील जगन्नाथपुरी,भुवनेश्वर,कटक, कोलकाता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालॅंड, अरुणाचल येथून दिसणार आहे. तसेच१० जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण,१९ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण आणि शनिवार ४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे.परंतू ही तीनही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत.त्यामुळे सन २०२१ हे नूतन वर्ष ‘ग्रहणमुक्त‘ आहे असे म्हणता येईल.२७ एप्रिल आणि २६ मे रोजी असे आकाशात दोनवेळा सुपरमून दिसणार आहे.
चंद्रबिंब जेव्हा एखाद्या ग्रह किंवा तारकेला झाकून टाकतो त्याला ‘पिधान युती‘ म्हणतात.यावर्षी १७ एप्रिल रोजी चंद्र- मंगळ पिधान युती दिसणार आहे. मंगळ चंद्राआड जाताना दिसणार नसला तरी सायं. ७-२१ वाजता मंगळ ग्रह चंद्रबिंबामागून बाहेर पडताना दिसणार आहे.खगोलप्रेमींसाठी ही दुर्मिळ घटना आहे.दरवर्षींप्रमाणे ४ जानेवारी,२२ एप्रिल,५ मे,२० जून,२८ जुलै,१२ ऑगस्ट, २२ ऑक्टोबर,१७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबर रोजी रात्री आकाशातून उल्कावर्षाव होताना पहायला मिळणार आहे.१९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी गुरू ग्रह आणि २१ फेब्रुवारी ते १६ एप्रिल शुक्र ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाहीत, असेही सोमण म्हणाले.