जालन्यामधील धामणा धरणाला तडे, 4 गावांना मोठा धोका

03 Jul 2019 11:27:15


 

जालना : भोकरदन तालुक्यातील धामणा धरणात नव्वद टक्के जलसाठा झाला आहे. परंतु धरण झाल्यापासून धरणाची दुरुस्ती न झाल्याने धरणाच्या सांडव्याला तडे गेलेले आहेत. मुसळधार पावसामुळे थेट या भिंतीतूनच पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रकल्पाच्या भिंतीला तडे गेल्यामुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 

मंगळवारी रात्री रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये तिवरे धरण फुटल्याची घटना घडली. या घटनेत धरणाखालील गावे पाण्याखाली गेली असून आतापर्यंत 7 मृतदेह आढळले असून 21 जण बेपत्ता आहे. या घटनेची माहिती कळताच धामणा धरण परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे धामणा धरणाकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

 
हवामान खात्याने जिल्ह्यात २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यातच धामणा धरणाच्या भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. मागच्या पाच वर्षात पहिल्यांदाच धरणात एवढा पाणीसाठा झाला आहे. हे धरण फुटल्यास सेलूद, पारध, पारध खुर्द आणि बुद्रुक या चार गावांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
Powered By Sangraha 9.0