प्रकाश आंबेडकर स्वबळावर लढणार, महाआघाडीला ठेंगा

12 Mar 2019 22:51:12

 

 
 
अकोला : ओवैसी बंधूंच्या एमआयएम या पक्षाशी हातमिळवणी करत ‘वंचित-बहुजन आघाडी’ ची स्थापना करणारे भारिप-बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला ठेंगा दाखवत आपण स्वबळावरच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. महाआघाडीने वंचित-बहुजन आघाडीला जवळ करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. तथापि, त्यांना यश न आल्याने महाआघाडीला आणखी मोठा धक्का बसला आहे.
 

अकोला येथील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली. येत्या १५ मार्च रोजी राज्यातील सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. काँग्रेसबरोबरचे सर्व प्रस्ताव संपले, आता चर्चा होऊ शकत नाही. सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसबरोबर आता आघाडी शक्य नसून येत्या १५ तारखेला बहुजन वंचित आघाडीतर्फे राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहेप्रकाश आंबेडकरांना आघाडीत आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. अनेक दिवस ही मनधरणी सुरू होती. तथापि, महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल १२ जागांची मागणी केली, जी पूर्ण करणे काँग्रेस-राष्ट्रवादीला अशक्य होऊन बसले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0