सरकार आणि सहकार यापेक्षा सर्वात मोठे संस्कार ! : राज्यपाल

29 Dec 2019 19:23:08


KJSB_1  H x W:


कल्याण : “सरकार किंवा सहकार असो, या सर्व कारभाराला सांभाळण्यासाठी संस्कारांची आवश्यकता आहे. त्यामुळेच मतदारांचा आणि ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो. महाराष्ट्रात हे काम विश्वसनीय असल्यानेच सहकार क्षेत्राचा वटवृक्ष बहरला आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.


दि कल्याण जनता सहकारी बँकेचा ४६वा वर्धापन दिन रविवार
, दि २९ डिसेंबर रोजी कल्याण येथील के. सी. गांधी सभागृहात पार पडला, यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्ताने विशेष कार्यक्रमात ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधीया न्यासाच्यावतीने ठाणे जिल्ह्यातील स्टील क्षेत्रातील उद्योजक कृष्णलाल धवन, बांधकाम व्यावसायिक महेश अग्रवाल आणि हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर (उपमहाव्यवस्थापक) गिरीधर मोगरे, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, मधुसूदन पाटील, संचालक कल्याण जनता सहकारी बँक आदी मान्यवरांची मंचावर विशेष उपस्थिती होती. तसेच बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, उपाध्यक्ष मधुसूदन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवडकर, संचालक समाजसेवा पुरस्कार निधीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय, सचिव मोहन आघारकर, कोषाध्यक्ष निशिकांत बुधकर आदी मान्यवर उपस्थित होते.



KJSB_1  H x W:

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राज्यपाल म्हणाले, “सध्या बँकांची स्थिती पाहता दि कल्याण जनता सहकारी बँक आपल्या सहकार आणि सामाजिक क्षेत्रात करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. कल्याण जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व ग्राहकांना शुभेच्छा देत पुढील वाटचाल ही दहा हजार कोटींपर्यंत पोहोचावी,” असे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. संचालक समाजसेवा पुरस्कार निधी संस्थेच्या कामाचाही गौरव त्यांनी केला. “ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले, त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे या कार्यात आपण सर्वांनी हातभार लावावा,”असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 


KJSB_1  H x W:

आपल्या अध्यक्षीय भाषणात सुरेश पटवर्धन म्हणाले
, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या सहकार क्षेत्राला आदर्श ठरेल, असे काम करत कल्याण जनता सहकारी बँक पाच हजार कोटींच्या टप्प्यात पोहोचली आहे. हा विश्वास ग्राहकांनी दाखवल्यानेच हे शक्य झाले आहे.” संचालक समाजसेवा पुरस्कार निधी संस्थेबद्दल माहिती देताना संस्था अध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय यांनी संस्था स्थापना आणि उद्दिष्टे यांची माहिती दिली. बँकेच्या संचालकांनी आपले सभाशुल्क संस्थेकडे सोपवत समाजकार्य करणार्‍या ठाणे जिल्ह्यातील व्यक्तींना सन्मान करण्यासाठी वापरला जातो, याची माहिती दिली. आजवर या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या संस्था आणि व्यक्तींचे स्मरण त्यांनी केले.

 


पुरस्कार विजेत्यांच्यावतीने भास्कर शेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले
, “आजचा हा सन्मान केवळ माझा किंवा माझ्यासोबत पुरस्कार मिळालेल्या मित्रांचा नव्हे तर हा आपल्या सर्व समाजाचा आहे,” असे सांगत भास्कर शेट्टी यांनी पुरस्कारात मिळालेला ५० हजारांचा निधी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्यासोबत कृष्णलाल धवन यांनीही पुरस्काराची रक्कम संस्थेला दिली. बँकेचे संचालक मधुसूदन पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. रत्नाकर पाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Powered By Sangraha 9.0