अयोध्या सुनावणी : 'अयोध्येत ५०-६० मशिदी, मुस्लीम कुठेही नमाज अदा करू शकतात'

15 Oct 2019 18:08:13



'हिंदूसाठी मात्र अयोध्या रामाची जन्मभूमी आहे
आणि जन्मभूमीची जागा बदलली जाऊ शकत नाही'


नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी आज १५ ऑक्टोबर रोजी ३९ वी सुनावणी पार पडली. गेले दीड महिना रामजन्मभूमी विषयावर सुनावणी सुरु आहे. सध्या संपूर्ण खटला अंतिम टप्प्यात आला असून, गुरुवारी १७ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या युक्तिवादांना पूर्णविराम दिला जाईल. आज हिंदू पक्षाच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ के. परासरन यांनी युक्तिवाद केला.


रामललाच्या वतीने युक्तिवाद करताना, के. परासरन म्हणाले कि, " 'मी शासक आहे आणि मी म्हणजेच कायदा' असे विदेशी आक्रमक भारतात येऊन म्हणू शकत नाहीत. हिंदूंचे राजे शक्तीशाली असले तरीही त्यांनी परदेशात जाऊन कधीही इतर धर्मीयांची धर्मस्थळे नष्ट केली नाहीत. संपूर्ण सुनावणीतील हा महत्वाचा पैलू आहे."

'मुस्लीम तर कुठेही नमाज अदा करू शकतात, एकट्या अयोध्येत ५०-६० मशिदी आहेत', हा मुद्दाही जेष्ठ वकील के. परासरन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणला. हिंदूसाठी मात्र अयोध्या रामाची जन्मभूमी आहे आणि जन्मभूमी बदलली जाऊ शकता नाही, असेही ते म्हणाले. एकदा मंदिर म्हणून निश्चित झालेली जागा कायम मंदिरच असते , हा मुद्दाही प्रकर्षाने मांडण्यात आला. जन्मभूमीच्या जागेवर असलेल्या वास्तूच्या कायदेशीर अस्तित्वाविषयी के. परासरन यांना न्या. चंद्रचूड यांनी प्रश्न विचारला होता.

"डॉ. धवन ..आम्ही आज पुरेसे प्रश्न त्यांनाही विचारीत आहोत, काल तुम्ही दावा केला होता कि आम्ही त्यांना कोणतेही प्रश्न विचारत नाही", अशी विचारणा, मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केली.
Powered By Sangraha 9.0