शेतीपूरक व्यवसाय सुरु केल्यास शेतकऱ्यांना फायदा : जिल्हाधिकारी मिश्रा

12 Jun 2018 10:22:01


वाशीम : 'शेतीपूरक अशा व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा अथवा व्यवसाय सुरु करून दिल्यास त्याचा त्यांना सर्वात अधिक फायदा होईल' असे मत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या 'आत्मा'च्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

‘आत्मा’ने केलेल्या आवाहनानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यवसाय प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांसाठी आपली मागणी आणि नावे नोंदविली आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन आदी शेती पूरक व्यवसायाचाही समावेश आहे. यापार्श्वभूमीवर काल आत्माची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावर बोलता मिश्रा यांनी या व्यवसायाचे प्रशिक्षण ‘आत्मा’मार्फत आयोजित करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले.

तसेच या व्यवसायासाठी आवश्यक बाबी शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी प्राप्त होतील, त्यासाठी शासकीय योजनेचा लाभ घेता येईल का, याविषयी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केले जावे. केवळ प्रशिक्षण देऊन न थांबता संबंधित शेतकऱ्याला सदर व्यवसाय उभारणीसाठी पूर्णतः मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
Powered By Sangraha 9.0