अकरा जुलै. बरोब्बर दहा वर्षांपूर्वी ह्याच दिवशी मुंबई परत एकदा बॉम्बस्फोटांनी हादरली होती. लोकलच्या वेस्टर्न लाईनवर एकाच वेळी सात स्फोट झाले. २०० माणसं मेली. ७०० च्या वर जखमी झाली.
आई लवकरच ऑफिसमधून येईल ह्या आशेवर चिमणी पोरं घरात वाट बघत राहिली. तरुण मुलाचा छिन्नविछिन्न झालेला देह कपड्यांवरून ओळखायची पाळी वृद्ध आई-वडिलांवर आली. किती संसार कायमचे उध्वस्त झाले. २७ वर्षांचा एक तरुण नऊ वर्षे कोमात जाऊन, झिजून झिजून गेला. बॉम्बस्फोट झाले तेव्हा त्याची बायको गरोदर होती. त्याच्या लेकीला भरवायला, खांद्यावर घेऊन घोडा-घोडा करायला, बोट धरून शाळेत सोडायला बाबा कधी मिळालाच नाही.
काय उपयोग आहे हे सगळं बोलून पण? आपली प्रसार माध्यमं बुऱ्हान वाणीच्या मृत्यूचा शोक करण्यात मग्न आहेत आणि लोक त्यांच्या दैनंदिन आयुष्यात. जे लोक गेले, जे जखमी झाले, केवळ ती कुटुंबे सोडली तर कुणाला आठवण तरी आहे का अकरा जुलैची?
अकरा जुलै आणि गोध्रा. दोन वेगवेगळे प्रसंग, पण साम्य एकच आहे. गेलेल्या माणसांचं कुणी नावही घेत नाही. २०० माणसं मेली, १०० माणसं मेली. नुसतं वाचून सोडून द्यायचं आपण. पुढचा दहशतवादी हल्ला होईपर्यंत कानावर आणि डोळ्यांवर झापडं बांधून गपगुमान आपलं आयुष्य जगायचं. काही वाटून घ्यायचं नाही. पेटून तर मुळीच उठायचं नाही.
झुरळांना कुठे फरक पडतो एखाद्या विषारी औषधाच्या फवाऱ्यात सापडून इतर झुरळे मेली तर?