वाढवण बंदर भारताच्या जागतिक महासत्तेचे दार : मंत्री नितेश राणे

पालघरमध्ये जाऊन मंत्री नितेश राणेंनी घेतला प्रकल्पाचा आढावा

    01-Mar-2025
Total Views |

nitesh rane at palghar meeting



पालघर दि.२८: विशेष प्रतिनिधी 
वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आ.राजेंद्र गावित, आ.विलास तरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदिप, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील, आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले, वाढवण बंदरामध्ये महाराष्ट्र शासनाचा २६ टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाचा केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्यामार्फत स्थानिकांना वाव देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. वाढवण बंदरामुळे मोठा रोजगार निर्माण होणार आहे. तो रोजगार पालघर जिल्हयातील स्थानिकांना मिळायला पाहिजे. स्थानिक मच्छिमारांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांची भावी पिढी या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभी राहिल व आर्थिक सक्षम होइल. त्याबाबत संबंधितांना प्रशिक्षण देऊन वाढवण बंदराच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचा विकास आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी प्रकल्प उभारणीच्या कामात संबंधित अधिकाऱ्यांनी जलदगतीने काम करावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बंदर विकास विभागा मार्फत होणारी गुंतवणूक व त्याची परिस्थिती काय आहे? प्रकल्पाची कामे कुठपर्यंत आली आहेत याचाही आढावा मंत्री नितेश राणे यांनी घेतला.