मुंबई : बोली भाषा हा भारताचा आत्मा आहे. भारतीय संस्कृती ही भाषिक संस्कृती असून तिचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांनी केले. मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमान्य सेवा संघ, पारले संचालित श्री. व. फाटक ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री गणेश देवी यांच्या मुलाखतीतून झाली. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गणेश देवी यांची मुलखात घेतली.या दरम्यान त्यांनी आपल्या भाषेसंदर्भातील संशोधनाचा प्रवास उलगडला. ते म्हणाले की " लोकं भाषा जीवंत ठेवतात आणि घडवतात सुद्धा. भाषा म्हणजे जीवनाकडे बघण्याची एक वृत्ती आहे. उत्क्रांतीच्या टप्प्यावर माणसाला भाषा अवगत झाली, ज्यामुळे तो प्राणीमात्रांपेक्षा वेगळा ठरला. कालांतराने भाषा हे माणसाचे शस्त्र झालं" सलग ३ वर्ष भारतातील बोली भाषांच्या नोंदींच्या प्रकल्पाबद्दलचा प्रवास सुद्धा त्यांनी विषाद केला. भारतातील विविध भाषिक प्रवाह, मौखिक भाषांची परंपरा, संस्कृती आणि प्रकृती यांच्यातील भाषिक फरक नेमका काय यावर सुद्धा देवी यांनी प्रकाश टाकला. काश्मीर ते कन्याकुमारी आणि अंदमान ते अरूणाचाल प्रदेश असा बोली भाषांचा समृद्ध पट त्यांनी या संवादात जाहीरपणे सादर केला. प्रख्यात बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांच्या बरोबर बोली भाषेचे काम करताना आलेले अनुभव सुद्धा देवी यांनी विषाद केले. भारतीय भाषांनी जगातील अन्य भाषांमधून असंख्य शब्द घेतले आहेत, ज्यामुळे भारतीय भाषा समृद्ध झाल्या आहेत. आपल्या मराठी भाषेवर फारशी, पोर्तुगीज शब्दांचा प्रभाव आहे. मोठ्या प्रमाणात जेव्हा शब्दांची आदान प्रदान होते, त्यावेळेस भाषेचं वैभव वाढते. आजमितीला देवी यांचं योगदान भारतातील भाषेसाठी महत्त्वाचे आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे यांनी केली. यात त्यांनी गणेश देवी यांचा परिचयात श्रोत्यांना करून दिला. मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमाचे हे ४१ वे वर्ष असून, पुढच्या कार्यक्रमांची रूपरेषा सुद्धा त्यांनी प्रेक्षकांना सांगितली.