“चेतना कळसे जळली का जाळली?”; आमदार सुरेश धसांचा स्फोटक सवाल
22-Jan-2025
Total Views |
बीड : (Chetana Kalse Case) बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण लावून धरणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या तीन दशकापासून बीडमधील काही हत्या प्रकरणांचे दाखले देत त्यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या हत्या प्रकरणांचे दाखले देत असताना त्यांनी चेतना कळसे नावाच्या मुलीच्या ह्त्येचा उल्लेख केला.
काय म्हणाले सुरेश धस?
“चेतना कळसे नावाच्या मुलीचा जळून मृत्यू झाला पण जळली का जाळली याची परळीमध्ये जाऊन चौकशी करा. त्या भागातील लोकांना विचारलं, तर ते काय झालं ते सगळं सांगतील. चेतना कळसेच्या प्रकरणापासून या आरोपींना भीतीच उरली नाही. मग याचाच परिणाम संगीत दिघोळे, किशोर फड, आंधळे, गायकवाड आणि आता हे महादेव मुंडे असे अनेकांचे खून पडत गेले,” अशा शब्दांत आमदार धस यांनी स्फोटक माहिती दिली.
नेमकं काय आहे चेतना कळसे प्रकरण?
बीडमध्ये चेतना कळसे नावाच्या एका शिक्षकाच्या मुलीला जाळून मारण्यात आले होते, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. चेतना कळसेचा जळून मृत्यू झाला की जाळून मारण्यात आले याचा तपास करण्याचे आवाहन आमदार धस यांनी केले आहे. चेतना कळसेचे वडील बीडमध्ये कला शिक्षक होते. चेतनाच्या निधनाचा धसका घेऊन तिच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आईला वेड लागल्यामुळे येरवड्यात ठेवण्यात आले होते. तिची बहिण या घटनेनंतर गायब असून तिचाही तपास लागलेला नाही. ही घटना १९९७-९८ च्या दरम्यान घडली असल्याचे बोलले जात आहे.