जागावाटपाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्षांनी केले महत्वाचे विधान! म्हणाले, "ज्या जागेवर आम्ही..."
16-Sep-2024
Total Views |
नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सध्या महायूती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप सुरु असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक महत्वाचे विधान केले आहे. फक्त जिंकण्यासाठी लढायचं हा एकच आमचा फॉर्म्यूला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "कुठल्याही आकड्यावर न जाता केवळ जिंकण्यासाठी लढायचं, असा आमच्या तिन्ही नेत्यांचा आग्रह होता. जिथे अजितदादा जिंकतील तिथे त्यांचा आग्रह आम्ही मान्य करू. जिथे एकनाथ शिंदे जिंकतील तिथे त्यांचा आग्रह मान्य होईल आणि जिथे आम्ही जिंकू तिथे ते आमचा आग्रह मान्य करतील. हाच महायूतीचा फॉर्म्यूला आहे. यापेक्षा वेगळा कोणताच फॉर्म्यूला नाही," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही सगळे एकत्र बसून जिंकण्यासाठी लढायचं हा एकच फॉर्म्यूला निश्चित केला आहे. ७०-८० टक्के जागांवर आमचं एकमत झालं आहे. लवकरच एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा पत्रकार परिषद घेतील. महाविकास आघाडीच्या पूर्वी महायूतीचं जागावाटप झालेलं दिसेल," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.