तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 'टोकन दर्शन' पद्धत

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा; नाशिकच्या अहिरे दाम्पत्याला पूजेचा मान

    17-Jul-2024
Total Views | 81
vithanl rukhmini  
 
मुंबई :तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी 'टोकन दर्शन' पद्धत राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त केली. 'टोकन दर्शन' पद्धतीसाठी जिल्हा प्रशासन आणि मंदिर समितीने तयार केलेल्या १०३ कोटी रुपयांच्या आराखड्याला त्यांनी मान्यता दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे.
 
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या 103 कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंदिर समितीचा एमटीडीसीसोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल. तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याप्रमाणे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
 
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे (अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक) या दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, सचिन कल्याणशेट्टी, भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.
 
"आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले आहे. सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा... विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर", असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. पूजेनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
 
मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी वारकऱ्यांची संख्या २५ ते ३० टक्क्यांनी वाढलेली आहे. त्यामुळे सर्वत्र एक भक्तीमय वातावरण झालेले आहे. शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून, वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये तिपटीने वाढ केलेली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
 
मंदिर संवर्धनासाठी विशेष निधी
 
विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या १०३ कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंदिर समितीचा एमटीडीसीसोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल. भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
 
१ हजार खाटांचे रुग्णालय उभारणार
 
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्यावतीने चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून आतापर्यंत ८ लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. तसेच १५ लाख नागरिक या आरोग्य सुविधांच्या लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच पंढरपूर येथे देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यांच्यासाठी आरोग्य सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी लवकरच एक हजार खाटांची क्षमता असलेले नवीन रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान
 
- मानाचे वारकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे (मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक) यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील १६ वर्षांपासून नियमितपणे वारी करीत आहेत.
 
- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (देहू) यांना एक लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला.
 
दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (पुणे) यांना ७५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार, तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (इंदापूर) यांना ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
 
- यावेळी मेगडंबरीसाठी दोन कोटी ४५ लाख रुपयाची चांदी दान करणाऱ्या उद्योजक सुनील मोरगे यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121