अयोध्येतील खराब रस्त्याप्रकरणी सहा अभियंत्यांची हकालपट्टी; सरकारकडून कारवाईचा बडगा!
29-Jun-2024
Total Views |
लखनऊ : मान्सूनपूर्व पावसात अयोध्येतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. रामपथ येथील रस्ते पाण्याखाली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून ६ अभियंत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून या प्रकरणी कारवाई केली जात आहे.
दरम्यान, सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जल निगमच्या सहा अभियंता- अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. खराब रस्त्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जल विभागावर ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात पीडब्ल्यूडीसह जल विभागातील अभियंता-अधिकारींना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. तपास अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई होऊ शकते, अशी माहिती समजते आहे.
स्थानिक वृत्तानुसार, यूपी सरकारने तीन पीडब्ल्यूडी अभियंता, कार्यकारी अभियंता ध्रुव अग्रवाल, सहायक अभियंता अनुज देशवाल आणि कनिष्ठ अभियंता प्रभात पांडे यांना निलंबित केले आहे, तसेच, जल निगमचे कार्यकारी अभियंता आनंद कुमार दुबे, सहायक अभियंता राजेंद्र कुमार यादव आणि कनिष्ठ अभियंता मोहम्मद शाहिद यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
अयोध्येतील खराब रस्त्याप्रकरणी तपास अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई होऊ शकते. बांधकामाचा दर्जा निकृष्ट असणे हे या कोसळण्याचे प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने या घटनेला दिलेल्या तत्पर प्रतिसादात केवळ अभियंत्यांना निलंबित केलेच नाही तर नागरी कामात गुंतलेल्या गुजरातस्थित कंपनीच्या जबाबदाऱ्यांची सखोल चौकशी सुरू करण्यास सुरूवात केली आहे. फर्मला बांधकाम दर्जाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.