नवी दिल्ली: बाबरी मशिदीचे पुनर्निमाणाचे काँग्रेसचे दिवास्वप्न पूर्ण न होऊ देण्यासाठी मतदानाद्वारे राष्ट्रविरोधी षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा श्रीराम मंदिराचा निकाल फिरविण्याचा मनसुबा आहे, असा दावा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. त्यावर विहिंपचे आंतरराष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी काँग्रेसवर टिका केली आहे.
सत्ता आल्यानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या जागी पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी याचा मनसुबा असल्याचे समजते. त्यासाठी शाहबाने प्रकरणाप्रमाणे घटनादुरुस्ती करण्यासाठी काँग्रेस तयार आहे. काँग्रेसकडून अद्यापही याचे खंडन करण्यात आलेले नाही, याचा अर्थ काँग्रेसला हे मान्य आहे असाच होतो. इंडी आघाडीचा हा निर्णय जगातील कोट्यवधी राम भक्तांसाठी मोठे आव्हान आहे. रामभक्तांनी या रामविरोधी आणि देशविरोधी षडयंत्रांना मतदान करून अयशस्वी करण्याचे आवाहन विहिंपतर्फे करण्यात आले आहे. या देशद्रोही घटकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी विहिंपचा "१०० टक्के मतदान आणि राष्ट्रहितासाठी मतदान" हा संकल्प असल्याचे डॉ. सुरेंद्र जैन यांनी सांगितले आहे.