रेमल चक्रीवादळाचा इफेक्ट; मिझोराममध्ये भूस्खलनात १३ ठार तर १६ बेपत्ता
सततच्या पावसामुळे दगडाची खाण कोसळली; आसाममध्येही एकाचा मृत्यू
28-May-2024
Total Views |
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आल्यानंतर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मिझोरामधील आयझॉन येथील दगडखाणी कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. वादळामुळे संततधार पावसामुळे आयझॉनमधील दगडखाणी कोसळली आहे. यात १३ जणांचा मृत्यू झाला असून १६ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील खराब हवामानाबाबत मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी तातडीची बैठक बोलावली असून गृहमंत्री के सपडांगा, मुख्य सचिव रेणू शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, रेमल चक्रीवादळामुळे पुर्वेकडील राज्यांना याचा जोरदार तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले आहे. पश्चिम बंगाल, मिझोरामसह आसाममध्येही एकाचा मृत्यू झाला आहे. मिझोरमचे डीजीपी अनिल शुक्ला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी ७ स्थानिक लोक असून ३ इतर राज्यातील आहेत. सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
तसेच, ढिगाऱ्याखाली आणखी अनेक लोक अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे अडचणी येत आहेत. याशिवाय, आणखी एक ईशान्येकडील राज्य आसाममध्येही आज जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मोरीगाव जिल्ह्यात ऑटो रिक्षावर झाड पडल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. सोनितपूर जिल्ह्यात स्कूल बसवर झाड पडून १२ मुले जखमी झाली आहेत.
दरम्यान, सततच्या पावसामुळे मिझोराममधील सर्व शाळा, सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली असून खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. सदर परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेत प्रशासनास नियंत्रणासाठी योग्य त्या सुचना दिल्या आहेत. यात सालेम वेंग, आयझॉल येथे भूस्खलनानंतर एक इमारत पाण्यात वाहून गेल्याने तीन लोक बेपत्ता आहेत.