मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावरील हल्ला उबाठाच्या कार्यकर्त्यांना भोवला!

    18-May-2024
Total Views |

UBT

 
मुंबई : भाजप नेते आणि ईशान्य मुंबईचे महायूतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावरील हल्ला उबाठाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच भोवला आहे. याप्रकरणी उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उबाठा गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, शुक्रवारी मिहीर कोटेचा यांच्या मुलूंड येथील कार्यालयावर हल्ला करण्यात आला. यावेळी भाजप आणि उबाठा गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. तसेच त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहितीही पुढे आली होती.
 
हे वाचलंत का? -  ऐन निवडणूकीत पुण्यात उबाठा गटाला मोठा दणका!
 
दरम्यान, हा हल्ला आता उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी उबाठा गटाच्या २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शुक्रवार, १७ मे रोजी शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मिहीर कोटेचा या सभेला गेल्यानंतर त्यांच्या मुलुंडमधील कार्यालयावर हल्ला झाला. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली.