"काँग्रेस आणि उबाठाला मतदान करण्यासाठी मशिदीतून फतवे!"
राज ठाकरेंचा हल्लाबोल
11-May-2024
Total Views |
पुणे : काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मिशिदींमधून फतवे निघत आहेत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. शुक्रवारी पुण्यातील महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, "जे सुज्ञ मुसलमान आहेत ते फतव्यांना जुमानत नाहीत पण काँग्रेसला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा म्हणून मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये फतवे निघत आहेत. मुस्लिम समाजाला तुम्ही काय गुरं-ढोरं समजता का? त्यांना स्वतःचा विवेक नाही का? त्यांनाही समजतंय कोण आपल्याला वापरून घेत आहेत. मशिदींमधून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात असतील तर आज हा राज ठाकरे फतवा काढतोय, तमाम हिंदू माता-भगिनी-बांधवांसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा."
"गेल्या दहा वर्षांत तोंड वर न काढता आल्यामुळे अनेक लोकांची चुळबुळ सुरु आहे. नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकार यांच्याशी माझे काही मुद्द्यांबद्दल मतभेद आहेत ते राहणार. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं अभिनंदनदेखील मी करणार आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आपल्या देशात अनेक चांगले मुसलमान आहेत. ते आपापलं काम व्यवस्थित करत आहेत. प्रामाणिकपणे जगत आहेत. पण ज्यांना धार्मिक धुमाकूळ घालायचा आहे पण गेल्या १० वर्षात डोकं वर काढता आलं नाही त्यांना काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढायचं आहे आणि म्हणून हे सगळे फतवे निघत आहेत. चुकून पुन्हा त्यांच्या हातात सरकार गेलं तर पुन्हा रस्त्यावर फिरणं कठीण करुन ठेवतील. ८०-९० साली जो धार्मिक उन्माद सुरु होता तसाच पुन्हा हे उन्माद घालतील आणि त्या उन्मादाचा शेवट झाला तो बाबरी मस्जिदीचा ढाचा पडणं. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर या देशात राम मंदिर उभारलं जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण जर या देशात कुणामुळे राम मंदिर उभारलं गेलं तर ते नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकलं," असेही ते म्हणाले.