मुंबई : कलम ३७० हटवल्यानंतर काय फायदा झाला हे तुम्हाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही. कधीतरी काश्मीरमध्ये जाऊन बघा, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांवर केली आहेत. काश्मीरमधून कलम ३७० हटवून काय दिवे लावले, असे वक्तव्य राऊतांनी केले होते. यावर आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊतांना कलम ३७० हटवल्यानंतर काय फायदा झाला हे भांडूपमध्ये बसून कळणार नाही. त्यांनी हातात दिवा घेत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या चौकाचौकात फडकणाऱ्या तिरंग्याकडे बघावं. हा तिरंगा मोदी सरकार आणि अमित शाहांमुळेच फडकतो आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "अमित शाह महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी येतात. तुमच्यासारखं महाराष्ट्राशी गद्दारी आणि बदनामी करण्यासाठी येत नाही. तुम्ही कलम ३७० हटवण्याला पाठींबा दिला. कारण तुम्ही पाठींबा दिला नसता तर लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून तुमच्या मालकाला चपलेने मारलं असतं," असेही राणे म्हणाले आहेत.