सीरियात यादवी युद्ध! परराष्ट्रमंत्रालयाचे भारतीयांना परतीचे आवाहन

    07-Dec-2024
Total Views |

syria

दमास्कस : सीरिया मध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धाची धग आता तिथल्या नागरिकांच्या प्रवाशांना बसू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने आता तिथल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर भारतात परतण्याचे आवाहान केले आहे. त्याच बरोबर पुढील सूचना मिळेपर्यंत कोणीही सीरीयाला जाऊ नये असे आवाहन केले आहे.

परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांना माहिती दिली की सीरियामध्ये सुमारे ९० भारतीय नागरिक आहेत, ज्यातील १४ जणं ही संयुक्त राष्ट्र संघात काम करणारी आहे.भारतीय दूतावास हे नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहे. परराष्ट्रमंत्रालयाने मदतीसाठी आपला हेल्पलाईन नंबर आणि ईमेल पत्ता शेअर केला आहे. त्याच बरोबर परतताना सुद्धा सतर्कता आणि सुरक्षेची काळजी घेण्यात यावी अशी माहिती आपल्या सूचनेत परराष्ट्रमंत्रालयाने जारी केली आहे.

सीरीया मधील परिस्थीती का चिघळली ?
रशिया आणि इराणचा पाठिंबा असलेल्या बशर अल असादच्या या सरकारला सुरूंग लावण्याचे काम टर्की मधील बंडखोरांनी केले आहे. सीरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची सत्ता उलथवून लावण्याचा चंग या बंडखोरांनी बांधला आहे. सीरीया मधील अनेक शहरांनी या बंडखोरांच्या समोर नांगी टाकली आहे. या बंडखोरांनी जर होम्स या शहरावर कब्जा मिळवला, तर सीरीयाची राजधानी दमास्कसचा भूमध्य सागरी किनाऱ्याशी असलेला संपर्क तुटून असे. हयात तहरीर अल-शामचा नेता अबू मोहम्मद अल-जलानी, याने जाहीर केले आहे की सीरीयामधील असादची सत्ता उलथवून लावणे हा त्यांचा हेतू आहे. २७ नोव्हेंबर रोजी सीरीयाच्या सरकार विरोधात आघाडी उघडण्याची काम या बंडखोर गटाने सुरू केली आहे.