(Nitesh Rane on Kerala Mini Pakistan Statement)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केरळमधील अल्पसंख्याकांमुळेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक जिंकू शकले, असे म्हणत कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केरळला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधले होते. "आपला देश हिंदू राष्ट्र व्हावा, हीच आमची इच्छा आहे. हिंदूंना सर्व प्रकारे संरक्षण मिळायला हवे. केरळ हा भारताचा भाग आहे, पण तेथील हिंदू लोकसंख्या कमी होणे ही चिंतेची बाब आहे. हिंदूंचे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. त्याचबरोबर 'लव्ह जिहाद'च्या घटनांमध्येही वाढ होत आहे. देशात पाकिस्तानसारखी परिस्थिती उद्भवली तर त्याविरुद्ध कारवाई करायला हवी.", असे म्हणत त्यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
सासवडमधील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ येथे येथे रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी शिवप्रताप दिननिमित्ता आनंदोतसव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी केरळ मधील सद्यस्थितीची तुलना पाकिस्तानशी करत केरळला मिनीपाकिस्तान म्हणून संबोधले होते. नितेश राणेंनी आपल्या विधानातून वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी विरोधकांकडून वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचे दिसते आहे.
नितेश राणे पुढे म्हणाले, आमच्यासोबत एक व्यक्ती देखील उपस्थित होती, ज्याने १२ हजार हिंदू महिलांना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यापासून रोखले आहे. वायनाड भागातील कोणत्याही व्यक्तीला तुम्ही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबद्दल विचारू शकता. त्यांना पाठिंबा देणारे लोक कोण आहेत? त्यांना पाठिंबा देणाऱ्या संस्था कोणत्या? यांची सविस्तर माहिती मिळेल.