मुंबई : ( Mumbai )महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा झाला असून येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २० नोव्हेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देणे संबंधित नियोक्त्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
सुट्टीसंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यातील नियमांचे पालन न करणाऱ्या नियोक्त्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
सुट्टी संदर्भातील नियमावली :
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणतेही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य कोणत्याही आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी म्हणजेच बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सुट्टी द्यावी.
सर्व उद्योग समूह, महामंडळ, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना हा नियम लागू राहील.
या सुट्टीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही नियोक्त्याने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल.
लोक प्रतिनिधित्व अधिनियम- १९५१ च्या कलम १३५ (ख) नुसार, एखाद्या मतदाराची नोकरीवरील अनुपस्थिती ही तो ज्या नोकरीवर असेल त्या नोकरीच्या संदर्भात धोकादायक किंवा हानिकारक ठरणार असेल, अशा कोणत्याही मतदारावर उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही.
तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, कर्मचारी, अधिकारी आदींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान चार तासांची सवलत देता येईल. परंतु, अशाप्रकारच्या सवलत प्रकरणांमध्ये, जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नियोक्त्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे, उद्योग विभाग अंतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.