शिवाजी महाराजांची मंदिरे उभी करण्यापेक्षा विद्यामंदिरे उभी करणं गरजेचे : राज ठाकरे

    15-Nov-2024
Total Views |

mns
 
मुंबई : (Raj Thackeray) विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून आपला विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे हा कार्यक्रम पार पडला.
 
जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उबाठाच्या वचननाम्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे उभं करण्याच्या विषयावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा विद्यामंदिरे उभी करणं गरजेचे आहे. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे." असे त्यांनी सांगितले. मुलांना चांगले शिक्षण मिळणे आवश्यक आहे, तसेच प्रशासनापासून ते उच्छ शिक्षणामध्ये मराठी भाषेचा समावेश असायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 
मनसेच्या जाहीरनाम्यातील ४ भाग :

पहिला भाग - मूलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसे अन्न, पिण्याचे पाणी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रीडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार
दुसरा भाग - दळणवळण, वीज, पाण्याचे नियोजन, महाराष्ट्राभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस:रण, मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविवधता
तिसरा भाग - राज्याचे औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण
चौथा भाग - मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरात मराठी, व्यवहारात मराठी, डिजिटल जगात मराठी, जागतिक व्यासपीठावर मराठी, गड किल्ले संवर्धन, पारंपरिक खेळ.