"राहुल गांधी तुमची चौथी पिढी जरी आली तरी कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही"
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे प्रतिपादन
13-Nov-2024
Total Views |
मुंबई : (Amit Shah) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. कलम ३७० हटवण्यावरून प्रश्न विचारत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाले अमित शाह?
"काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने प्रस्ताव ठेवला की कलम ३७० पुन्हा लागू केले पाहिजे. मला सगळ्यात आधी उद्धवजींना विचारायचं आहे की उद्धवजी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगा की कलम ३७० पुन्हा आणायचे आहे की नाही. जाऊ द्या, उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यांच्या उत्तराची अपेक्षा ठेवू नका, पण मी सांगून जातो, राहुल गांधी तुमची चौथी पिढी जरी आली तरी कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही. भारतीय जनता पक्षासाठी जम्मू काश्मीर हा आमच्या सत्तेपेक्षाही प्रिय मुद्दा आहे. काश्मीर मधून दहशतवाद संपवण्याचे काम आमच्या पंतप्रधान मोदींनी केले आहे", असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केले.
"संसदेमध्ये जेव्हा कलम ३७० हटवण्यासाठी विधेयक घेऊन मी उभा होतो, तेव्हा राहुल गांधी, शरद पवारांचा पक्ष, ममता बॅनर्जींचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ओरडत होते. ते म्हणत होते की कलम ३७० हटवू नका. मी कारण विचारल्यावर ते म्हणाले होते की जर ३७० हटवले तर देशात रक्ताच्या नद्या वाहतील. राहुल गांधींनी लक्षात ठेवावे, कलम ३७० हटवून सहा वर्षे झाली रक्ताच्या नद्या तर सोडाच पण कोणाची दगड फेकण्याची हिंमत झाली नाही. पंतप्रधान मोदींनी देशाला आतंकवाद, दहशतवाद आणि नक्षलवादापासून मुक्त केले आहे" , असे अमित शाह म्हणाले.