राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत हे काय म्हणाले राज ठाकरे?

    14-Oct-2024
Total Views |

Raj Thackeray on RSS

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Raj Thackeray on RSS)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदाच्या विजयादशमीला शताब्दी वर्षात पदार्पण केलं. त्यामुळे देशभरातून शुभेच्छांचा वर्षाचा होतो आहे. संघाचं काम मला कायमच अचंबित करतं, असे म्हणत स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक खास पोस्ट केली आहे.

हे वाचलंत का? : वैचारिक प्रदूषण पसरवणाऱ्या कारस्थानांपासून समाजाचे रक्षण हीच काळाची गरज

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे.

पुढे ते लिहितात, संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे. मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.