नवी दिल्ली : ‘भारत’ या शब्दास विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी भारताची राज्यघटना वाचून बोलावे, अशा सल्ला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहे.
‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ हे नाव वापरण्यास काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित आयएनडीआय आघाडीने विरोध केला आहे. याप्रकरणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील काँग्रेस पक्षावर टिका केली आहे. ते म्हणाले, इंडिया हाच भारत आहे आणि हे संविधानात लिहिलेले आहे. मी प्रत्येकाला संविधान वाचायला सांगेन. जेव्हा तुम्ही भारत म्हणता, तेव्हा एक अर्थ आणि एक समज दृढ होते. माझ्यामचे आपल्या राज्यघटनेमध्येही त्याचेच प्रतिबिंब उमटले आहे.
या प्रकरणामुळे काँग्रेसप्रणित आयएनडीआय आघाडीमध्ये मात्र गोंधळ उडाला आहे. ‘भारत’ या शब्दास विरोध करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे. मात्र, आता यामुळे देशात आपल्याविरोधात वातावरण निर्माण होत असल्याची भावना काँग्रेसमध्ये निर्माण होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळेच काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आयएनडीआय आघाडीचे नाव बदलून ते ‘भारत’ असे करावे, असा विचार मांडला आहे. त्याचप्रमाणे आयएनडीआय आघाडीचे घटक असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीदेखील आघाडीचे नाव बदलावे, असे मत व्यक्त केले आहे.