नवी मुंबई : आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना आजच्या पिढीकडून देखील तितक्याच मनोभावे जोपासली जात आहे. अत्याधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात एक गाव एक गणपती ही संकल्पना अनेकांना अप्रुप करण्यासारखी आहे. विशेष म्हणजे या संकल्पनेमुळे वर्षभरातील वादविवाद विसरून जाऊन सर्व एकत्रित येऊन ग्रामस्थ गणपती उत्सव साजरा करतात. 29 गावांतील हे असे गाव आहे, की ज्यांच्याकडून सलग 63 वर्षांपासून हा एकोपा टिकवला जात आहे.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव बेलापूरच्या आग्रोळी गावात पाहायला मिळत आहे. या गावात ’एक गाव एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला जात असून, या उत्सवाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. या गावात 150 कुटुंबे आहेत. दरडोई दीड हजार रुपये वार्षिक देणगी जमवली जाते. गणेशोत्सवा दरम्यान 11 दिवस भजन, कीर्तन व मुलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रम राबवले जातात. कोणताही डामडोल न करता गावकीच्या लोकसहभागातून हा उत्सव साजरा केला जातो.
कॉर्पोरेट हब म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत सीबीडी-बेलापूरमधील पारसिक हिलच्या पायथ्याशी आग्रोळी गाव वसलेले आहे. एकेकाळी या गावाची उभ्या महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा गड अशी ओळख होती. ठाणे-बेलापूर पट्ट्यात 1961 मध्ये प्लेगची साथ आली होती. प्लेग या भीषण रोगाने रौद्र रूप धारण केले होते. बेलापूर पट्ट्यात भात शेतीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. अशात हा आजार, यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे घरातील गणरायाची स्थापना कशी करायची, असा प्रश्न गावातील प्रत्येक कुटुंबाला पडला होता. यावर उपाय म्हणून पंचक्रोशीत मान असलेले गावातीलच कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी गावकऱ्यांसमोर ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना मांडली.
सुरुवातीला ग्रामस्थांनी याबाबतची मनातील भीती कॉम्रेड पाटील यांना बोलून दाखवली. गणपतीची स्थापना न केल्यास देव कोपेल, अशा प्रकारची भीती समस्त ग्रामस्थांना होती. यावरही उपाय म्हणून कॉम्रेड पाटील यांनी स्वतःच्या घरातील मूर्तीपूजन बंद करून गावाच्या मंदिरात पूजन करत पुढाकार घेतला. परिणामी कॉम्रेड पाटील यांची भूमिका ग्रामस्थांना पटली. या परिवर्तनानंतर ग्रामस्थांनी जे ठरवले ते आजतागायत निरंतर सुरू सुरू असल्याचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी सांगितले. या गावातील एकही ग्रामस्थ संकल्पनेच्या विरोधात न जाता एक गाव एक गणपती ही संकल्पना मनोभावे जोपासत आहे.रात्री बारा वाजेपर्यंत अख्खा गाव गणपती बाप्पाच्या भक्तीत लिन असतो रात्री बारा च्या आरती नंतर मोजकीच मंडळी उपस्थित राहतात.
गावातील एकोपा आजही नव्या पिढीला आदर्शवत ठरवला जात आहे. गावात गौराई चे पूजन हे अनेकांच्या घरी केले जाते . पण गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा मात्र एकाच ठिकाणी केले जाते.अग्रोळी गावातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबईतील राजकीय तसेच इतर मंडळींची दहा दिवस गर्दी असते.दहा दिवस गावात उत्साहाचे वातावरण असते. विशेष म्हणजे कोरोना काळात देखील या उत्सवात कोणतीच खंडात पडली नव्हती अगदी साधेपणाने गणपती उत्सव साजरा करण्यात आला होता.
"अग्रोळी गाव हे नवी मुंबईतील एकमेव असे गाव आहे जिथे एक गाव एक गणपतीची संकल्पना आजही जोपासली जाते.बाप्पाचे आगमन व विसर्जन सोहळा धार्मिक कार्यक्रमानेच साजरा केला जातो. दहा दिवस धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात."
रोहिदास पाटील (एक गाव, एक गणपती मंडळाचे अध्यक्ष)