मुंबई : ``ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे वीज ही अत्यावश्यक व मूलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करताना मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे``, असे मत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केले.
पाठक पुढे म्हणाले, ``पंतप्रधान नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वात जी-२० परिषद दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे विविध देशांतील प्रतिनिधी भारतासोबत विविध करार करीत आहेत. भारताचा वेगाने विकास होत आहे. `वसुधैव कुटुंबकम` ही संकल्पना खऱ्या अर्थाने रूजत आहे. त्यामुळे भारत देश बदलतोय. वीज क्षेत्रातही आमुलाग्र बदल होत आहेत. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्हीही कंपन्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये मानव संसाधन विभागाची भूमिका खूप मोठी व व्यापक आहे. त्यासाठी त्यांनी वेगळा विचार (आऊट ऑफ बॉक्स) केला पाहिजे. खासगी वीज कंपन्यांशी स्पर्धा करताना आपण अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेमध्ये सुसंवाद ठेऊन पारदर्शी कारभार ठेवला पाहिजे. ``
परिषदेच्या सुरूवातीला महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे यांनी प्रास्ताविकातून परिषदेमागची भूमिका विषद केली. तिन्ही कंपन्यांमध्ये मानव संसाधन व कामगार अधिकाऱ्यांशी समन्वय रहावा, यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विश्वास पाठक यांचा सत्कार सुगत गमरे यांनी केला. सुगत गमरे यांचा सत्कार सुधीर वानखेडे यांनी केला. धनंजय सावळकर यांचा सत्कार आनंद कोंत यांनी केला. सुधीर वानखेडे यांचा सत्कार राजू गायकवाड यांनी केला.
यावेळी महापारेषणच्या वतीने महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची दोन दिवसीय सक्षमीकरण परिषद (मल्हार-२०२३) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे आयोजित केली आहे. त्या परिषदेत पाठक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) धनंजय सावळकर, महापारेषणचे मुख्य व्यवस्थापक (मा.सं.) सुधीर वानखेडे, महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) भूषण कुलकर्णी उपस्थित होते.