"प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ‘जग’ जिंकले"; जी-20 परिषदेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

    10-Sep-2023
Total Views |

Narendra Modi


मुंबई :
दिल्ली येथे ९ व १० सप्टेंबर रोजी जी-20 परिषद संपन्न झाली. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक सुवर्ण दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जग' जिंकले असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत जी-20 परिषदेचे कौतूक केले आहे.

 
यात त्यांनी म्हटले की, जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली, देशाला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. त्याचेच एक सकारात्मक चित्र संपूर्ण देशाने पाहिले, असे त्यांनी म्हटले.
 
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युएई सह अनेक बलाढ्य राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले. एकमताने आणि एक भावनेने एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी काम करण्याचे वचन पंतप्रधानांनी यावेळी दिले. या शिखर परिषदेत पंतप्रधानांनी मांडलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ एकमताने स्वीकारण्यात आला. जी-२० समूहाने टाळ्या आणि बाकं वाजवून त्याचे स्वागत केले. हे आपले मोठे राजनैतिक यश आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
तसेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना घेऊन भारताने जी-२० परिषदेचे यजमानपद स्वीकारले आणि यशस्वी आयोजनही केले. या राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पंतप्रधान श्री. मोदीजींच्या रूपाने भारताला प्रथमच मिळाला, ही देशवासियांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे, असे म्हणाले.
 
या शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ‘भारत’ यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान आहे. जगभरात श्री. मोदीजींची ‘जागतिक स्तरावरचा नेता’ अशी निर्माण झालेली प्रतिमा भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.