मुंबई : सामनातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील अग्रलेखावरुन भाजप नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत 'सामना' मध्ये खालच्या भाषेचा वापर करण्यात आल्याच्या निषेधार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वखाली सामना वृत्तपत्राची आज होळी करण्यात आली.
यावेळी बोलताना अतुल भातखळकर म्हणाले की, मेट्रो पासून एसआरए पर्यंतची अनेक विकास कामे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावली. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे काही नसल्याने 'सामना'त त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही 'सामना' वृत्तपत्राची होळी केली. तसेच हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी इशारा समजावा, असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाची अनेक कामे केली. सामान्य मुंबईकरांना दिलासा दिला. त्यांच्याबाबत अशा खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर आम्ही सहन करणार नाही. मुंबई महापालिकेच्या २३६ जागांसाठी तेच सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. हिंमत असेल तर सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घ्या मग 'दूध का दूध और पाणी का पाणी' होईल, असेही आमदार भातखळकर म्हणाले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.