दै. ‘मुंबई तरुण भारत’चे अभियान; योगिता साळवी यांनी मांडले वास्तव
14-Jun-2023
Total Views |
पुणे : सद्याच्या कुटुंब व्यवस्थेलाच ‘लव्ह जिहाद’चा विळखा बसत असल्याचे भयावह वास्तव दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी मांडले. कर्वेनगर येथील डॉ. भानूबेन वास्तुशास्त्र महाविद्यालयात बुधवार, दि. १४ जून रोजी कुटुंब व्यवस्थेला ‘लव्ह जिहाद’चा विळखा ‘माझे शहर, लव्ह जिहाद मुक्त शहर अभियान’अंतर्गत त्या बोलत होत्या. देशात सध्या सर्वाधिक ज्वलंत अशा ‘लव्ह जिहाद’ या विषयावर योगिता साळवी म्हणाल्या, “पालकांनतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षिका खरा मार्गदर्शक असतो. गुरुमधील शक्ती अफाट असून, एखाद्या विषयावरील मंथन करून ते समाजामध्ये खोलवर रुजविण्याची शक्ती त्यांच्यातच असते. निष्पाप लेकींना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधा,” असे आवाहनही त्यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा १२७ वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगिता साळवी यांनी ‘लव्ह जिहाद’ संदर्भात सत्यस्थिती मांडली. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उप कार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य जयंत इनामदार, डॉ. धनंजय कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी पालकांशी संवाद साधताना योगिता साळवी यांनी ‘लव्ह जिहाद’ म्हणजे नेमके काय, याची सुरुवात कशी होते, शाळेतील भोळ्या भाबड्या मुलींवर प्रेमाचे जाळे टाकून कसे ओढले जाते, हिंदू मुलींना जाळ्यात ओढून वाम मार्गाला आणि अकृत्य करण्यास भाग पाडले जाते, याची ज्वलंत उदारणे उपस्थितांसमोर मांडली. यातून आपल्या लेकींना, बेटींना वाचविण्यासाठी या विरोधात लढा उभारा, असे आवाहनही त्यांनी केले.
उपसंपादिका साळवी म्हणाल्या की, “गोडीगुलाबी लावून प्रेमाच्या आड लेकींवर अत्याचार केले जात असून, अशाप्रकारे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल ते प्रेम नसून षड्यंत्र आहे, हे लक्षात घ्यावे. राज्यात विविध ठिकाणी आजही अशा घटना घडत आहेत. त्या दडपल्या जात आहेत,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की, “शाळा महाविद्यालयातील असलेल्या विविध ‘डे’मध्ये मुलींना टार्गेट केले जाते. हे प्रकार थांबण्याची ताकद ही शिक्षिकांमध्ये आहे. पाल्यांकडे लक्ष देण्यास अनेकदा पालकांना वेळ मिळत नाही. जास्तीत जास्त पाल्य शिक्षकांच्या नजरेखाली असतात. शिक्षिकांच्या हातात विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले जाते. त्यामुळे या मानसिक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विद्यार्थ्यांशी मैत्रिपूर्ण संवाद साधून आपल्या मुलींना या षड्यंत्रणातून बाहेर काढावे,” असे आवाहन त्यांनी केले. प्रास्तविक कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी केले, तर सूत्रसंचालन महेंद वाघ यांनी केले.