मुंबई : महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसात पूर्ण केले आहे. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे.
भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी सदर जलबोगदा दिनांक ३१ मार्च २०२३ पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्के कपात जाहीर करण्यात आली होती.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी प्रत्यक्ष भेट देत बोगदा दुरुस्ती ठिकाण, दोन्ही झडपांची पाहणी केली. तसेच, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) वसंत गायकवाड यांना निर्देश दिले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर हांडे, सहायक अभियंता शेखर शिंदे, अभियंता (दुय्यम) राहूल चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष दुरुस्ती ठिकाणी अथक प्रयत्न केले आणि दुरुस्ती कामांमध्ये समन्वय देखील साधला. अखेर दिनांक १८ एप्रिल रोजी या जलबोगदा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. अंदाजे ३० दिवसांचा कालावधी दुरुस्तीकरीता अपेक्षित असताना प्रत्यक्ष १८ दिवसांमध्येच ही दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.
येत्या ३ ते ४ दिवसांत मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत
दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर आता हा जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जल अभियंता विभागातर्फे उद्या दिनांक १९ एप्रिल २०२३ पासून आवश्यक त्या झडपांच्या प्रचलनास तातडीने सुरूवात करण्यात येणार आहे. जल बोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. असे असले तरी, या अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची देखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मुंबई महानगराचा पाणीपुरवठा रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३ पासून पूर्ववत होणे अपेक्षित आहे, असे जल अभियंता विभागाने कळविले आहे.