शिवसेना भाजपा युतीला राष्ट्रवादीची गरज नाही

चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

    12-Apr-2023
Total Views |
chandrashekhar-bawankule-on-shiv-sena-bjp-alliance

छत्रपती संभाजीनगर : राज्यात शिवसेना भाजपा युती अभंग आहे. राष्ट्रवादीची गरज आम्हाला पडेल असे वाटत नाही, असे स्पष्ट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करून सद्याच्या राजकीय चर्चाना विराम दिला. ते म्हणाले, "मुळात शिवसेना-भाजप युती हेच जनतेचे मत आणि हाच जनतेचा कौल आहे."

छत्रपती संभाजीनगर येथे ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, बहुमत चाचणी झाल्यास 184 मते पुन्हा मिळतील. त्यामुळे इतर कोणाचीही मदत घेण्याचा प्रश्नच येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची करत नाहीत, असे म्हणणे हा विपर्यास आहे. ते दोघेही राज्याच्या विविध भागात फिरून आढावा घेत असून शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी दुप्पटीने मदत केली आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, की त्यांची टिप्पणी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्यासारखे आहे. त्यामुळे मी त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही.

वैयक्तिक टीकेला महत्व नको असे म्हणत, लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, वैयक्तिक टिप्पणीला महत्त्व द्यायला नको. तुम्ही सभांमध्ये तुमचे धोरणे मांडा, महाराष्ट्राचे व्हिजन मांडा मात्र वैयक्तिक टिका करणाऱ्यांना निपटवण्यास भाजपा सक्षम आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहे, यावर बावनकुळे म्हणाले की, याबाबत कुणालाही फोन आलेला नाही. आशीष शेलार दिल्लीला गेले असतील तर त्यांचं काही वेगळं काही काम असेल. भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला याबाबत काहीही सूचना केलेली नाही.