कामगार सुरक्षेला प्राधान्य : का आणि कसे?

    30-Nov-2023
Total Views |
Industrial Accidents


एकीकडे नुकतेच उत्तरकाशीतील बोगद्यातून ४१ कामगारांची सुटका झाल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे मागील काही महिन्यांत देशाच्या कानाकोपर्‍यात घडलेले औद्योगिक क्षेत्रातील अपघातही तितकेच चिंताजनक ठरावे. त्यानिमित्ताने या अपघातांमागची कारणे आणि सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...


सुमारे एक महिन्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील एका प्रक्रिया उद्योगात झालेला मोठा स्फोट व त्यानंतरच्या भीषण आगीत सात कामगारांच्या झालेल्या मृत्यूमुळे रायगड वा राज्य पातळीवरच नव्हे, तर सारेच उद्योग क्षेत्र पुरतेपणी हादरून गेले. या आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी अपघाती व जीवघेण्या घटनांनंतर औद्योगिक क्षेत्रातील कामकाज प्रक्रिया व कर्मचारी-कामगार सुरक्षेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. मात्र, त्याकडे कायमस्वरुपी गांभीर्याने पाहिले जाते का, प्रश्न मात्र त्याच्या प्रश्नचिन्हासह कायमच उरतो.वरील घटनेपूर्वी सुमारे पाच महिने आधी अंबरनाथ औद्योगिक परिसरातसुद्धा मोठा व दुर्दैवी औद्योगिक अपघात घडला होता. त्या ठिकाणीसुद्धा लागलेल्या भीषण आगीत होरपळल्याने सहा कामगार जखमी झाले, तर एका कंत्राटी कामगाराचा याच दुर्घटनेत मृत्यू झाला, ही तशी ताजी वस्तुस्थिती आहे.

औद्योगिक अपघातांच्या संदर्भात स्थळ-काळ कुठलेही असो अपघात, अपघातांची भीषणता व त्यांची धग मात्र कायम असते हेच खरे. औद्योगिक अपघातांच्या याच भीषण मालिकेत पुदुच्चेरी येथील औषध निर्माण करणार्‍या कंपनीतील मोठ्या व भीषण अपघाताचा उल्लेख करणे, नव्या संदर्भात अपरिहार्य ठरते. त्या ठिकाणी आगीत होरपळून १४ कामगार मृत्युमुखी पडले, या आकडेवारीवरूनच अपघाताच्या दाहकतेची कल्पना सहजपणे येते.संख्येच्या आधारे सांगायचे झाल्यास, यावर्षीच्या दहा महिन्यांमध्ये कारखान्यांमध्ये मोठ्या व गंभीर स्वरुपातील आगीचा सुमारे १२ घटना जाहीर करण्यात आल्या आहे. ही संख्या अर्थातच नोंद झालेल्या मोठ्या आणि भीषण स्वरुपातील आगीच्या घटनांची आहे. यातून औद्योगिक क्षेत्रातील आगीच्या मोठ्या अपघातांची संख्या व त्यांची भीषणता स्पष्ट होते.

वरील प्रकारच्या गंभीर व जीवघेण्या अपघातांचा तपशील आणि त्यांची भीषणता यांचे तपशीलवार विश्लेषण-विवेचन करणे अर्थातच आवश्यक ठरते. या संदर्भात मोठ्या प्रमाणावर काम करणार्‍या व देशपातळीवर सुमारे दोन हजारांच्यावर कंपन्यांना ’औद्योगिक व कामगार सुरक्षा’ या महत्त्वाच्या विषयात सल्ला-सेवा देणार्‍या ’अपरिजीता’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नागराज कृष्णन यांनी त्यांचा अभ्यास व अनुभव या आधारावर नमूद केल्यानुसार आज कामगार-कर्मचार्‍यांपासून छोट्या, मोठ्या कारखानदारांपर्यंत औद्योगिक व कामगार सुरक्षेच्या संदर्भात प्रमुख व अत्यंत महत्त्वाच्या अशा औद्योगिकदृष्ट्या पर्यावरण रक्षण, आरोग्य व्यवस्थापन व मुख्य म्हणजे कर्मचारी-कंपनी यांची सुरक्षा यासंदर्भात पुरेशा व महत्त्वाच्या अशा कायदेशीर तरतुदी असताना; पण त्यांचा आवश्यक असूनही अपेक्षित व पुरेशा प्रमाणात अवलंब होत नाही. परिणामी, कुठल्या ना कुठल्या कारणाने औद्योगिक अपघातांचा सामना सर्वांना करावा लागतोच. अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात.

भीषण स्वरुपातील अपघातांच्या संदर्भात नागराज कृष्णन यांनी अनुभवसिद्ध अशी विशेष टिप्पणी केली असून, ती नेहमीच चिंतनीय ठरली आहे. त्यांनी विशेषतः औषध उत्पादक कंपन्यांमधील मोठ्या व गंभीर स्वरुपातील अपघातांचा अभ्यास करून नमूद केलेली बाब म्हणजे औषध निर्माण कंपन्या, त्यांची उत्पादन पद्धत व प्रक्रियेच्या पालन करण्यावर जेवढा आग्रही जोर देतात, त्या तुलनेत या कंपन्या उत्पादन क्षेत्राशी निगडित व तेवढ्याच महत्त्वाच्या व अत्यावश्यक अशा उत्पादन-प्रक्रिया व मानवीय सुरक्षा या मुद्द्यांकडे पुरेसे लक्ष देत नाही. औषध निर्माण क्षेत्रात असणार्‍या विविध प्रकारच्या गंभीर प्रक्रियांमुळे मशीन-माणूस या उभयंतांचे मोठे नुकसान औषध उद्योगातील अपघातांमुळे होतेे.
 
 
तसे पाहता, ’श्रमिक क्षेत्र’ हे आपल्या घटनेनुसार केंद्र व राज्य अशा उभय सरकारांकडे असले, तरी या संदर्भातील कामगार कायद्यांपासून, पर्यावरण संरक्षण, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य व कामगार कल्याण या विषयांची अंमलबजावणी करण्याचे व काम राज्य सरकारकडे असते. यासाठी प्रत्येक राज्य सरकारची आपापल्या गरजांनुसार स्वतंत्र यंत्रणा व व्यवस्था आहे. या व्यवस्थेतून विशेषतः कामगार आरोग्य व सुरक्षा यांसारख्या महत्त्वाचा विषयावर प्रबोधन प्रशिक्षणापासून कायदेशीर कारवाई करण्यापर्यंतचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे जबाबदारीची जाणीव विविध स्तरांवर निर्माण झालेली असली तरी औद्यागिक क्षेत्रात व त्यातही विशेषतः जोखमीच्या कामाच्या संदर्भातील कामगार सुरक्षेचे आव्हान मात्र कायम आहे.उद्योग व कामगार क्षेत्रातील विषय तज्ज्ञांनुसार कंपन्यांनी त्यांच्या व्यावसायिक उलाढालींपैकी दोन टक्क्यापर्यंतची राशी आपल्या उद्योग-व्यवसायाशी संबंधित पर्यावरण संरक्षण, कामगार आरोग्य व सुरक्षा या विषयांवर प्रशिक्षण, संशोधन, सुधारणा इत्यादींवर करणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र, याला मूलभूत व मुख्य तरतुदीची अंमलबजावणी होतेच असे नाही.

परिणामी, उद्योग क्षेत्रातील कामांच्या संदर्भातील अपघात-अनारोग्य, जखमी होणे व प्रसंगी औद्योगिक अपघातातून कायमचे अपंगत्व व मृत्यू या जोखमीच्या स्थितीचा सामना अनेकांना करावा लागतो. यातच भर पडते ती आग आणि आगींमुळे होणार्‍या विविध अपघातांची. छोट्या-मोठ्या आगींमुळे होणारे अपघात सोडा; पण मोठ्या भीषण व कारखान्यात जीवघेण्या ठरलेल्या आगींमुळे गेल्या सहा महिन्यांत देशपातळीवर झालेल्या बहुचर्चित आगींच्या अपघातांचा गोषवारा पुढीलप्रमाणे मांडता येईल.

तारीख उद्योगाचा प्रकार औद्योगिक अपघाताचे स्थान
 
 
४ नोव्हेंबर - औषध  निर्माण-   पुदुच्चेरी

३ नोव्हेंबर - औषध प्रक्रिया - महाड-रायगड

१३ ऑक्टोबर - औषध निर्माण - तेलंगण

४ ऑक्टोबर - औषध उत्पादन - अमृतसर

१२ सप्टेंबर - औषध निर्माण- पियमपूर (इंदोर)

२९ जुलै - औषध प्रक्रिया-  वाळूज, महाराष्ट्र


हे सर्वज्ञात आहे की, रसायन उद्योगांतर्गत येणार्‍या औषध प्रक्रिया उद्योगांमध्ये कच्चा माल संग्रह हाताळणे, त्यावर प्रक्रिया करणे हे अत्यंत जिकिरीचे असते. त्यासाठी जाणकार, अनुभवी व शिक्षित-प्रशिक्षित कर्मचारी-अधिकारी प्रक्रिया तंज्ञाची आवश्यकता असते.या मुद्द्याला अधिक गती मिळावी, यासाठी संस्थागत स्तरावर सन २००० मध्ये ’इंडियन फार्मास्युटिकल्स्’ने आपल्या सर्व सदस्य कंपन्यांसाठी कारखाने व औषध निर्माण प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्द्यांचा बारकाईने व तपशीलवार अभ्यास विचार करून विशेष मागदर्शन मुद्दे संकलित करून वितरित केले. त्याचा पुढे सदस्य कंपन्यानी अवलंब करावा, यासाठी विशेष कार्यशाळा, मार्गदर्शक सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्याचा काही प्रमाणात फायदा झाला. मात्र, त्याला सातत्याने व्यापक स्वरूप देणे आवश्यक होते.

औद्योगिक अपघात व विशेषतः जीवितहानी होणार्‍या अपघातप्रसंगी अपघाताचे गांभीर्य पाहता, शासन-प्रशासनाची भूमिका सद्यःस्थितीत कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्याची असते. मात्र, या कठोर कायदेशीर कारवाईला विशेष प्रशिक्षण, सराव-अनुभव, सुरक्षेसह कामकाजाचा प्रसारप्रचार करून ज्याप्रमाणे रसायन-औषध उद्योगात उत्पादनांच्या दर्जावर जेवढा भर दिला जातो, तेवढाच भर कामाच्या ठिकाणी कर्मचारी कंपनीच्या सुरक्षेवर देणे, हाच या प्रकरणी कायमस्वरूपी व परिणामकारक तोडगा ठरू शकतो.


दत्तात्रय आंबुलकर

(लेखक एचआर व्यवस्थापन मार्गदर्शक आहेत.)