वसई : साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" ज्येष्ठ साहित्यिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने हा कार्यक्रम वसई - विरार शहर महानगरपालिका आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या सहकार्याने शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता वसई पश्चिम येथील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात संपन्न झाला.
२१ व्या साहित्य जल्लोष कार्यक्रमातील तिसरे सत्र म्हणजे कविसंमेलन! कविसंमेलन दुपारी ठीक 3.00 वाजता सुरु झाले. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी लिहिलेले हरिप्रिया हे गाणे गाऊन उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.
पालघर-बोईसर विभागातील कवी दिपक सोनावणे, कवयित्री संध्या सोंडे, प्रीती भोईर, शीतल संखे, डहाणू येथील कवी हर्षित चुरी, विरार येथील कवी प्रकाश जाधव, नालासोपारा येथील कवयित्री सुप्रिया घोरपडे, वसईतील कवी नितीन जोशी, कवयित्री संध्या गायकवाड, प्रज्ञा जोशी यांनी आपल्या कविता सादर केल्या. वसईतील जेष्ठ गझलकारा ज्योती बालिगा राव यांनी आपली गझल सादर करून रसिकांची व निमंत्रित कविंची दाद मिळवली. त्याचप्रमाणे संमेलनाच्या पूर्वसंधेला घेण्यात आलेल्या काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्या विध्यार्थ्यांनीदेखील अतिशय चांगल्यारीतीने कविता सादर करून सर्वांची मने जिंकली.
निमंत्रित कवी म्हणून कवी संकेत म्हात्रे, कवी आदित्य दवणे व कवयित्री अश्विनी शेंडे उपस्थित होत्या. त्यांनी अतिशय सुंदररित्या आपल्या कवितांचे सादरीकरण केले. कवयित्री संगीता अरबुने - सुरेखा धनावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कवी-लेखक प्रकाश पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.