गुवाहाटी : देशातील विशिष्ट धर्माचे धार्मिक शिक्षण देणारे मदरसे हे शैक्षणिक कार्य करण्याचे सोडून दहशतवाद्यांच्या विचारसरणीची प्रचार - प्रसार केंद्रे म्हणून काम करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आसाम राज्यातील बोंगईगाव जिल्ह्यातील असेच दहशतवाद्यांचे केंद्र म्हणून काम करणारा मदरसा आसाम सरकारने भुईसपाट केला. याच घटनेवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी एका मुलाखतीत "मी मदरसा नाही तर अल कायदाचे कार्यालय तोडले आहे" असे सडेतोड उत्तर देत त्यांनी राज्य सरकारच्या या कारवाईच्या विरोधात गळा काढणाऱ्या लोकांची तोंडे बंद केली.
३१ ऑगस्ट रोजी आसाम सरकारने ही मरकाझूल -मा - अरिफ या मदरशावर कारवाई केली. जिल्हा प्रशासनाने या बद्दल माहिती देताना हा मदरसा शैक्षणिक कार्य करण्याचे सोडून मुलांमध्ये कट्टरवादी विचारांची पेरणी करण्याचे काम करतोय अशा तक्रारी स्थानिकांकडून प्रशासनाकडे आल्या होत्या. त्याशिवाय या मदरश्याची इमारत अत्यंत धोकादायक बनली होती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत ही काळजीची गोष्ट होती त्यामुळे ही कारवाई करणे अत्यंत गरजेचे होते. या मदरशामध्ये शिकणाऱ्या मुलांची इतर शाळांमध्ये सामावून घेण्याचीसोय करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल चिंता करण्याचे काहीच कारण नाही असेही प्रत्युत्तर सरमा यांनी दिले आहे.
या मदरशांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची अल कायदा तसेच अन्सरुल्लाह बांग्ला टीम या दहशतवादी संघटनांशी असलेली कनेक्शन्स उघड झाली होती. आसाम मधील मदरशांचे दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध सातत्याने उघड होत आहेत, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत काळजीची घटना बनत आहे. याच पार्श्वभूमीवर हिमंत बिस्वा सरमा यांचे उत्तर अत्यंत महत्वाचे ठरते.