मुंबई : आपली मते मोकळेपणाने मांडण्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याचेही नाव येते. सामाजिक असो वा राजकीय जवळपास प्रत्येक मुद्द्यावर तो आपले म्हणणे मांडत असतो. अनेक हिट चित्रपट देणारा अनुराग त्याच्या ‘दोबारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी का होत आहेत, यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
बॉलिवूडची सद्यस्थिती आणि दाक्षिणात्य चित्रपटांना ज्या गतीने इथेही यश मिळत आहे यावर अनुराग कश्यपने भाष्य केलंय. अनुराग म्हणतोय, बॉलिवूडची परिस्थिती एवढीही गंभीर नाही जेवढं त्याच्याबद्दल आत्ता नकरात्मक बोललं जात आहे.' पुढे तो म्हणतोय की “तुम्हाला कसं कळतंय की दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतायत. तेलुगूमध्ये एखादा चित्रपट चालतो. तमिळ आणि कन्नडमध्ये तसंच आहे. तिथला प्रत्येक चित्रपट सुपरहिट होतोय की नाही हे तुम्हाला कसं कळतंय? मागच्या आठवड्यात कोणता चित्रपट प्रदर्शित झाला हे तुम्हाला माहितही नसेल. कारण कोणी त्या चित्रपटाकडे स्वतःहून फिरकत नाही.”
“सध्या मुख्य समस्या ही आहे की लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. पनीरवर जीएसटी लावण्यात आला आहे. तुम्ही खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारत आहात. त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी हा बहिष्काराचा ट्रेंड आणला आहे. लोक चित्रपट पाहण्यासाठी जातात जेव्हा त्यांना खात्री असते की चित्रपट चांगला आहे किंवा ते वर्षानुवर्षे त्याची वाट पाहत असतात. पण खाद्यपदार्थांवर जीएसटी लावल्यानंतर लोक चित्रपट पाहण्यासाठी पैसे कुठून आणतील.”
अलिकडे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर का चालत नाही आहेत याबद्दल सांगताना अनुराग म्हणाला, “लोकांना चांगला सिनेमा बघायचा आहे. मला मान्य आहे की अलिकडच्या काळात असे काही चांगले चित्रपट आहेत जे चालले नाहीत पण आपण आर्थिक मंदीतून जात आहोत हे समजून घेतलं पाहिजे. आज बिस्किटे, पनीर यासारख्या वस्तूंवर कर आकारला जात आहे. चित्रपट आपले मनोरंजन करेल याची खात्री होईपर्यंत लोक महागडी चित्रपटाची तिकिटं खरेदी करतील असं तुम्हाला वाटतं का? '